पालघर: ६ मे च्या सायंकाळ पासून आज दुपारपर्यंत जिल्ह्यात ठीकठिकाणी निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीमुळे तसेच झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मालमत्तेचे, मच्छीमार, मिठागर, वीटभट्ट्या तसेच शेती बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने या नुकसानीचे पंचनामे करण्यास आरंभ केला आहे.

भारतीय हवामान विभागाने गुजरात मधील चक्रीवादळाच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. काल सायंकाळपासून डहाणू तालुक्यात प्रथम वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. नंतर पालघर, विक्रमगड, वाडा तसेच जव्हार, मोखाडा या भागात देखील काही काळ पाऊस सुरू राहिला. आज सकाळी आठ वाजल्यापासून किनारपट्टीच्या भागात पावसाला सुरुवात झाली व सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता.

या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे छत उडाल्याच्या घटना घडल्या असून लग्नकार्याचा मुहूर्त असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. रब्बी भात पिकाची कापणी अपूर्णा अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून चिकू, लीची, आंबा, जांभु, जांभ व रानमेवा फळझाडांची फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे व बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अवेळी पावसामुळे वीटभट्टी व मिठागरांचे नुकसान झाले असून झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक ठिकाणी १०- १२ तासांपेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा व इंटरनेट सेवा खंडित राहिली.

समुद्रकिनारी असणाऱ्या व विशेषता धाकटी डहाणू बंदरातील बोटी तुफानी वाऱ्यामुळे एकमेकांवर आदळून नुकसान झाले असून सुक्या मासळीचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. या वादळी वातावरणाचा व अवकाळी पावसामुळे जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने दिला असून शासकीय यंत्रणेने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यास आरंभ केल्याचे सांगण्यात आले. अवकाळी पाऊस पुढील दोन दिवस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने नागरिक तसेच शेतकरी व बागायतदारांमध्ये चिंतेचे ढग कायम राहिले आहेत.

तालुका निहाय झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये :

तलासरी : ६.३०

डहाणू : ८.९०

पालघर : १८.७०

वसई : २७.५०

विक्रमगड : ८.७०

वाडा : ८.४०

जव्हार : १५.१०

मोखाडा : १२.१०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मनुष्यहानी, मालमत्ता व शेती-फळबागा यांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचा तपशील प्राप्त झाल्यानंतर नुकसानभरपाई बाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. – डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हाधिकारी