वाडा: शासकीय योजनांचा लाभ मिळावा, ओळख व्हावी या उद्देशाने शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांला आधारकार्ड आवश्यक केले आहे. प्रत्येक पालकांनी पाल्याचे आधारकार्ड बनवून घेण्याची जबाबदारी असताना जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर सोपवली आहे. त्यामुळे शिक्षणासह या नव्या जबाबदारी पार पाडताना शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहे. केंद्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बनविण्यासाठी मेळावे घेतले तर ते विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना संयुक्त ठरेल, असे काही शिक्षकांकडून सुचविण्यात आले आहे. आधारकार्ड यंत्र दोन वर्षांपासून पडून विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बनविण्यासाठी महसूल विभागाने प्रत्येक तालुक्यातील शिक्षण विभागाच्या गटसधन केंद्रांमध्ये दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून मशीन दिलेल्या आहेत. त्या वापराविना पडून आहेत. वाडा येथील केंद्रातही दोन मशीन वापरलेल्या गेलेल्या नाहीत, असे सांगितले जाते. विद्यार्थ्यांना शिकविण्याव्यतिरिक्त अन्य कामे शिक्षकांवर लादली तर विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख कसा उंचावेल. यासाठीच शाळाबाह्य कामे करण्यास आमचा विरोध आहे व राहील. -मनेश पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षकसेना, पालघर जिल्हा.