कासा : पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्त्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे. चौक, बस थांबे, इमारती इत्यादी ठिकाणी जाहिरात ही नित्याचीच बाब असली तरी झाडांवर खिळे ठोकून अनेक जण जाहिरातीचे बॅनर लावत असल्याचे वास्तव आहे. तलवाडा ते जव्हार या रस्त्यावरील झाडांवर जाहिरातींमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संताप उसळला आहे. तलवाडा ते जव्हार या रस्त्यावर सुशोभीकरण आणि शीतल छाया मिळावी, यासाठी झाडे लावण्यात आली आहेत.काही झाडे पुरातन असल्याने त्यांचा आवाकाही मोठा झाला आहे. मात्र या मोठय़ा वृक्षांचा काही महाभागांनी जाहिरातीसाठी वापर सुरू केला आहे. जाहिरात बॅनर लावण्यासाठी झाडांना खिळे ठोकून ते लावण्यात आले आहे. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना झाडांवर जाहिराती दिसत असताना कारवाई का केली जात नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा, वनसंपदेचे संवर्धन करा,’ अशा घोषणा देत पर्यावरण सुरक्षेचे धडे देते. मात्र दुसरीकडे झाडांचा जाहिरातीसाठी मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. झाडांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे तापमानात वाढ, वातावरणात बदल, बदललेले नैसर्गिक ऋतुचक्र, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वाढता दुष्काळ अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे परिश्रम, मेहनतीने वाढविण्यात आलेल्या वृक्षावर खिळे ठोकून जाहिरात फलक लावण्यात येतात. फ्लेक्स लावण्यात अडथळा निर्माण झाल्यास प्रसंगी झाडाच्या फांद्याही छाटल्या जातात. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.झाडांवर खिळे ठोकता येत नाही. तरीदेखील शहरात राजरोसपणे झाडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावले जातात. ही बाब नियमबाह्य आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी.- वैभव राऊत, वृक्षप्रेमी