डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २९ एप्रिल ते ७ मे दरम्यान बंद पडलेल्या वाहनांना धडकून तीन अपघात झाले असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर टायर पंचर होणे आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे अनेक वेळा वाहने बंद पडत असून बंद वाहनांच्या मागे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे अपघात घडत असून अनेकांना जीवाला मुकावे लागत आहे. महामार्गावर बंद वाहनांच्या मागे सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित चालक आणि महामार्ग प्रशासनाची असून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहनचालकांना नाहक जीवाला मुकावे लागत असल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रिय महामार्गावर २९ एप्रिल रोजी आच्छाड गावाच्या हद्दीत गुजरात वाहिनीवर उड्डाणपुलावर बंद पडलेल्या ट्रकला धडकून कंटेनर चालकाचा भीषण अपघात झाला. यामध्ये चालक संतोष कुमार याला गंभीर दुखापती होऊन उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १ मे रोजी दापचरी तपासणी नाक्याजवळ गुजरात वाहिनीवर पहिल्या वाहिनीवर बंद पडलेल्या ट्रकला धडकून कांतीलाल चव्हाण या टेम्पो चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोन घटना ताज्या असतानाचा बुधवार ७ मे रोजी तलासरी पोलीस ठाण्याच्या समोर मुंबई वाहिनीवर बंद अवस्थेत असलेल्या एका ट्रकला धडकून इम्रान मिन्हाज शेख (३४) या दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राष्ट्रिय महामार्गावर वाहने बंद पडणे, अपघात, इंधन संपणे अश्या आपत्कालीन स्थितीत चालकांच्या मदतीसाठी गस्ती पथकाची नेमणूक करणे आवश्यक आहे. असे असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत गस्ती पथक आपले काम योग्यरीत्या करत नसल्याचे दिसून येत आहे. महामार्गावर प्रवास करताना चांगले रस्ते आणि चालकांना आवश्यक सुविधा देण्याच्या दृष्टीने टोल च्या स्वरूपात कर आकारणी केली जाते. मात्र टोल वसूल करणाऱ्या कंपनीकडून चालकांच्या सुविधेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
महामार्गावर बंद पडणारी वाहने तासंतास एकाच जागी उभी राहत असून चालकांना वाहने बाजूला काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा चालक वाहनांमध्ये एकटेच असल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी महामार्गावर कार्यरत गस्ती पथकाने आपले काम योग्य रित्या करण्याची गरज व्यक्त होत आहे.
राष्ट्रिय महामार्गावर प्रवास करताना चालकांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जातो. या टोलच्या बदल्यात चालकांना चांगले रस्ते, स्वच्छतागृह, आपत्कालीन परीस्थितीत चालकांच्या मदतीसाठी गस्ती पथक, अपघात झाल्यास रुग्णवाहिका, क्रेन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असताना महामार्ग प्राधिकरणाकडून या सर्व सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यामुळे अश्या अपघाताच्या वेळी महामार्ग प्रशासनाला जबाबदार का धरू नये असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महामार्गावर बंद पडणाऱ्या वाहनांसाठी गस्ती पथक नेमण्यात आले आहे. या गस्ती पथकामार्फत बंद पडलेल्या वाहनांच्या मागे सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत. शिवाय महामार्गावर बंद पडलेले वाहन महामार्गावरील यंत्रणेमार्फत तासाभरात रस्त्याच्या बाजूला काढणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. महामार्गावर बंद वाहनांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज दिसून येते. – हरबंस सिंह नन्नाडे,
महामार्ग अभ्यासक महामार्गावर वाहनचालकांच्या मदतीसाठी प्रत्येकी ४० किलोमीटर अंतर्गत तीन गस्ती पथक तैनात आहेत. वाहन चालकांना अडचणी निर्माण झाल्यास त्याठिकाणी गस्ती पथक मदतीसाठी पोहोचते. काही वेळेत तांत्रिक अडचणींमुळे पोहोचणे शक्य होत नसेल मात्र चालकांना आवश्यक मदत पोहचवण्यासाठी प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच वाहनचालकांनी देखील आपत्कालीन परिस्थितीत १०३३ या क्रमांकावर संपर्क करून सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामार्ग प्रशासनामार्फत करत आहोत. – सुहास चिटणीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण