डहाणू: डहाणू शहर तसेच डहाणू-नाशिक राज्य मार्गावर सरावली, आशागड, गंजाड परिसरात मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सकाळ-संध्याकाळ रहदारीच्या रस्त्यांवर गुरांचे कळप ठाण मांडून बसलेले असतात. रात्री-अपरात्री रस्त्यावर बसलेली गुरे न दिसल्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
मुख्य राज्य मार्गावर गुरांनी ठाण मांडल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यामुळे ही समस्या वाढतच जाते. रात्री सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक जनावर आले आणि चालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही की अपघात होतात. अनकेदा गुरांना वाचवण्याच्या नादात गाडीचे नुकसान होते. चालक जखमी होतात. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
डहाणू नगर परिषद तसेच महामार्गावरील संबंधित ग्रामपंचायतीने याबाबत कडक कारवाई करण्याची गरज आहे. डहाणू आगार येथे नगर परिषदेचा कोंडवाडा आहे. मात्र अशा गुरांना पकडून कोंडवाडय़ात नेऊन ठेवण्यासाठीची सोय आणि यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे मोकाट गुरांची संख्या वाढतच आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक मात्र त्रासले आहेत. नगर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion cattle grazing in dahanu increase accidents herds animals road amy
First published on: 14-05-2022 at 00:09 IST