कासा: दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर साठ किलोमीटरच्या अंतरावर एकच टोल नाका चालू राहील, अशी घोषणा केली. मात्र पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे आणि चारोटी असे दोन टोल नाके केवळ ४७ किमीच्या अंतरावर आहेत. गडकरी यांच्या घोषणेनुसार हे टोल नाके येत्या तीन महिन्यांत बंद होणार का, याकडे वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत टोल नाक्यांसंबंधी मोठी घोषणा केली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर आता ६०किलोमीटरच्या अंतरात एकच टोल नाका असेल, या परिघात दुसरा टोल नाका आढळल्यास तो तीन महिन्यांच्या आत बंद करण्यात येईल अशीही माहिती गडकरी यांनी दिली. नॅशनल हायवे फी, २००८ (डिटर्मिनेशन ऑफ रेट्स अँड कलेक्शन) या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांनुसार दोन टोल नाक्यांमध्ये साठ किलोमीटर इतके अंतर असावे, असा नियम असून देशातील सर्व राज्यांना तो लागू आहे, असे गडकरी यांनी आपल्या विधानात पुढे सांगितले. मात्र मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यात खानिवडे येथे एक टोलनाका असून दुसरा टोल नाका चारोटीजवळ आहे. या दोन्ही टोल नाक्यांमधील अंतर केवळ ४७ किमी आहे. या परिसरातून अनेक स्थानिक मालवाहतूक करणारी वाहने येजा करतात. त्यांना या दोन दोन टोल नाक्यांमुळे अधिक टोल भरावा लागतो. त्यामुळे गडकरींच्या घोषणेनुसार महामार्ग प्राधिकरण प्रत्यक्ष कारवाई करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.पालघर जिल्ह्यात दोन टोल नाके आहेत. तेथे कार/जीपला ६५ रुपये तर हलक्या वाणिज्यिक वाहनास ११५ रुपये टोल आकारला जातो. ट्रकसाठी हे दर २३० तर बहुदुरीय वाहनांसाठी ३७५ इतके आहे. जवळच्या अंतरावरील या टोल नाक्यांमुळे वाहनचालकांना दुप्पट टोल द्यावा लागतो. मी चारोटीचा रहिवासी असून मालवाहतूक करणारा टेम्पो चालवतो. परंतु मला वसईला जाण्यासाठी चारोटी आणि खानिवडे अशा दोन टोल नाक्यांवर आकार भरावा लागतो. यापैकी एक टोल नाका बंद झाला तरी माझ्यासारख्या अनेक सामान्य वाहनचालकांना दिलासा मिळेल. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या नियमाची अंमलबजावणी करावी.- खिमला पटेल, स्थानिक वाहन मालक