डहाणू : पालघर जिल्ह्यात मंगळवार ६ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस दाखल झाला असून मंगळवारी दुपारा पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यांनतर संध्याकाळच्या सुमारास गुजरात भागातून पावासाने जिल्ह्याच्या दक्षिण भागात शिरकाव केला असून रात्री जिल्ह्याच्या बऱ्याचश्या भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस दाखल झाला. अवकाळी पावसामुळे नागरिकांची त्रेधा तिरापिट उडाली असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांची धांदल उडाली असून शेतकऱ्यांना उन्हाळी भात पीक, आंबा बागायती, जांभूळ, मिरची सह अन्य विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टी चालकांना देखील अवकाळीचा मोठा फटाका बसला असून उत्पादित विटा पाण्यामध्ये विरघळून खराब झाल्या आहेत. हजारो रुपये गुंतवून तयार केलेल्या विटांचे नुकसान झाल्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. तसेच गवत पावली साठवून विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना अवकाळीचा मोठा फटका सहन करावा लागला असून हजारो रुपयांचे गवत भिजून नुकसान झाल्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीच्या सामना करावा लागणार आहे. त्याच प्रमाणे उघड्यावर दुकाने लावून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या साहित्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील काही भागात घरांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून काही ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती देण्यात येत आहे. मुसळधार पाऊस दाखल झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरण विभागाकडून जिल्ह्याच्या बऱ्याचश्या भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून रात्री उशिरा पर्यंत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. अवकाळी पावसामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाकडून नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

गतवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस दाखल झाला होता. या वेळी वादळी वाऱ्यांसह दाखल झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी अनेक घरांचे छप्पर उडून नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र पंचनामे होऊन देखील नागरिकांना अनेक महिने भरपाईची वाट पाहावी लागली असून काही जणांना तुटपुंजी मदत मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळेल अथवा नाही याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.

पालघर तालुक्यातील नागझरी आणि रावते दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे याठिकाणी पर्यायी वाहतुकीसाठी मातीचा रस्ता ठेवण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे पर्यायी रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्यामुळे इथून वाहतूक करणे अशक्य झाले असून यामुळे दोनही बाजूला नागरिकांची कोंडी झाली आहे. पायी चालत जाण्यासाठी हे अंतर खूप जास्त असल्याने नागरिकांना मोठा फेरा मारून आपल्या इच्छित स्थळी पोहोचावे लागणार असल्याची माहिती इथल्या स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन तासापासून वीज पुरवठा खंडित

जिल्ह्यात सायंकाळपासून अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांसह शहरी भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच पालघर तालुक्यातील शिरगाव रस्त्यावर विजेच्या तारांवर झाड पडल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. अनेक ग्रामीण भागात पाऊस व वाऱ्याचा वेग मंदावला असून देखील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.