सफाळेसह इतर १७ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू पालघर: सफाळे व सतरा गाव पाणी प्रश्न अखेर निकाली लागला असून महावितरण विभागाला नागरिकांच्या पाण्याच्या समस्या विषयी महत्त्व पटवून दिल्यानंतर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. गेल्या अठरा ते वीस दिवसांपासून या १८ गावांना पाणी प्रश्न भेडसावत होता. वीज बिल थकीत असल्याने महावितरण पाणी पुरवठा योजनेची मुख्य वाहिनीचा वीजपुरवठा खंडित केला होता. पाण्याची गंभीर समस्या उद्भवल्यानंतर गावातील नागरिकांनी या योजनेच्या पाणी समिती अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मनीषा निमकर यांच्याकडे धाव घेतली होती. त्या अनुषंगाने निमकर यांच्यासह या भागातील आमदार राजेश पाटील यांनी नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेत तातडीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सखोल चर्चा घडून आली. बिल थकीत असले तरी नागरिकांना पाण्यावाचून ठेवू नका, त्यांची समस्या समजून घ्या व योजनेचा वीज पुरवठा सुरु करा अशी विनंतीवजा मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केल्यानंतर विज पुरवठा पूर्ववत करण्याचे अधीक्षक अभियंता यांनी मान्य केले. त्यानुसार वीज पुरवठा पूर्ववत करून पाणीपुरवठा योजनेमार्फत 18 गावांना तातडीने पाणी पुरवून त्यांना जल दिलासा मिळाला. गेल्या वीस दिवसांपासून बंद असलेले पाणी घरात आल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. वारंवार या योजनेचे वीज बिल थकित राहत असल्याने योजनेत समाविष्ट असलेल्या गावातील ग्रामसेवक, प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याचे एक मत झाले. शुRवारी त्यासाठी एकत्रितरीत्या बैठक घेण्यात येणार आहे.