ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके साहित्य नगरी, पालघर : महिलांनी लिहिलेल्या साहित्याकडे संकुचित आणि पूर्वग्रह दृष्टिकोनातून पाहिले जाते; परंतु याकडे सार्वत्रिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असून महिलांनीही त्यांच्या लेखनात तितक्याच ताकदीने प्रयोगशीलता आणावी, असे आवाहन साहित्यिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी शनिवारी पालघर येथे केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून मोनिका गजेंद्रगडकर यांनी साहित्यप्रेमींबरोबर संवाद साधला. उद्घाटक म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री-लेखिका मधुरा वेलणकर-साटम उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत स्वागताध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी प्रास्ताविकामध्ये महिला साहित्य संमेलनाची गरज याविषयी भूमिका मांडली. स्त्रियांच्या स्वातंत्र्याला सन्मानाची जोड आवश्यक आहे, असे सांगत दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये स्त्री पात्रांना दुय्यम पद्धतीने वागवले जात असतानाही आपण अशा मालिका आवडीने पाहतो. हे खेदजनक आहे, असे गजेंद्रगडकर यांनी नमूद केले. समाजमाध्यमांवर लिखाण करताना आपणच संपादक आहोत, या भूमिकेत जाऊन साहित्याचे पुनर्लिखाण करायला हवे, अशी सूचना त्यांनी केली. महिलांचे साहित्य कमी प्रमाणात वाचले जात असल्याचे निदर्शनास आणून हे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. महिलेला सहजपणे साहित्यनिर्मिती करण्यासाठी पोषक वातावरण तयार करायला हवे, तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये साहित्यिक चळवळ रुजवण्यासाठी महिलांसाठी चर्चासत्र, बचत गटांच्या माध्यमातून वाचनालय आदी उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. एकाग्रता भंग झाल्यानंतरही सर्जनशील लेखन करण्याची ताकद महिलांमध्ये असल्याचे सांगत महिलांना समाजामध्ये निर्भयतेने वावरता आले, तर अधिक प्रमाणात साहित्यनिर्मिती होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सक्षम लेखनासाठी.. लहानपणापासून चौकटीत राहणाऱ्या महिलांनी पुढील पिढी बदलावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत, असा सल्ला देताना मधुरा वेलणकर यांनी भावी पिढीला माणूस म्हणून वाढवावे. वास्तव उभे करण्यासाठी नाटकाला ताकद द्यावी लागते. त्याचप्रमाणे लिखाणातील ताकदीने साहित्यिक वाचकांसमोर त्यांच्या मनातील चित्र उभे करीत असतो. सक्षम लेखन करण्यासाठी वाचनही तितकेच महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी सांगितले.