-
Tamil Actors in Politics: तमिळनाडूच्या राजकारणात सिनेसृष्टी आणि सत्ता यांचे एक वेगळेच समीकरण पाहायला मिळते. तेथील जनतेने आपल्या लाडक्या अभिनेत्यांना केवळ पडद्यावरच डोक्यावर घेतले नाही, तर राज्याच्या सत्तेची धुराही त्यांच्याकडे सोपवली. एम.जी. रामचंद्रन (MGR) यांनी १९७२ मध्ये AIADMK ची स्थापना करून या प्रवासाला एक नवी दिशा दिली, त्यानंतर जे. जयललिता, एम. करुणानिधी यांसारख्या दिग्गजांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद भूषवले. सध्याच्या काळात कमल हासन आणि थलापती विजय यांसारखे सुपरस्टार्स देखील स्वतःचे राजकीय पक्ष काढून सक्रिय झाले आहेत. सध्या थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाच्या यशाची सध्या चर्चा होतेय. याचनिमित्ताने तमिळ अस्मिता आणि सिनेसृष्टीतील लोकप्रियता यांच्या जोरावर राजकारण गाजवणाऱ्या अशाच काही निवडक कलाकारांच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
एम. जी. रामचंद्रन (एमजीआर)
एमजीआर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते आणि आजही आहेत. त्यांच्या चित्रपटांच्या कथा प्रामुख्याने गरिबांच्या कल्याणासाठी लढणाऱ्या नायकावर आधारित असायच्या, त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप प्रेम होतं. सुरुवातीला ते ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ (DMK) पक्षाचा भाग होते, परंतु कलैग्नार करुणानिधी यांच्याशी झालेल्या वादानंतर १९७२ मध्ये त्यांनी स्वतःचा ‘अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम’ (AIADMK) हा पक्ष स्थापन केला. ते सलग तीन वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले. -
जे. जयललिता
जे. जयललिता या पडद्यावर अत्यंत प्रभावशाली अभिनेत्री होत्या आणि त्यांची एमजीआर यांच्यासोबतची जोडी सर्वाधिक यशस्वी ठरली होती. एमजीआर यांच्या पावलावर पाऊल ठेवत जयललिता यांनी ‘एआयएडीएमके’ (AIADMK) पक्षात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांना एमजीआर यांचा राजकीय वारस मानलं गेलं नव्हतं, परंतु ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांनी एमजीआर यांच्या निधनानंतर पक्ष आणि राज्याचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले. मुळात ब्राह्मणविरोधी तत्त्वे असलेल्या या पक्षात असूनही, जयललिता तब्बल पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या, जो एक विक्रम आहे. -
विजयकांत
‘कॅप्टन’ विजयकांत म्हणून ओळखले जाणारे हे तामिळ सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय स्टार होते आणि त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. विजयकांत यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात त्यांनी लष्करी कॅप्टन आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारल्या. यामुळे लोकांमध्ये त्यांची एक विशिष्ट प्रतिमा तयार झाली. एमजीआर यांच्याप्रमाणेच त्यांनाही गरिबांसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी काम करणारा नेता म्हणून ओळखले जावे अशी इच्छा होती, त्यातूनच त्यांनी २००५ मध्ये ‘देशिया मुरपोक्कू द्रविड कळघम’ (DMDK) या पक्षाची स्थापना केली. विजयकांत कधीही तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत, तरीही त्यांचा पक्ष राज्यात ‘डीएमके’ की ‘एआयएडीएमके’, कोणाचे सरकार येणार हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असे. -
कमल हासन
कमल हासन यांनी नेहमीच त्यांची राजकीय मते उघडपणे मांडली आहेत. मात्र, ‘डीएमके’ आणि ‘एआयएडीएमके’ या दोन्ही पक्षांच्या चुकीच्या तत्त्वांवर आणि कामांवर टीका करत त्यांनी या दोन्ही पक्षांत प्रवेश करणे टाळले. २०१६ मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर सत्ताधारी ‘एआयएडीएमके’मध्ये अंतर्गत वाद सुरू झाले आणि राज्यातील राजकारण अस्थिर झाले. अशा परिस्थितीत, भाजप आणि द्रविड शक्तींना पर्याय म्हणून कमल हासन यांनी २०१८ मध्ये ‘मक्कल निधी मय्यम’ (MNM) या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. त्यांना गांधीवादी विचारांवर आधारित एक पक्ष तयार करायचा होता, परंतु या पक्षाला तामिळनाडूमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. -
खुशबू सुंदर
एक बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या खुशबू सुंदर आज तामिळनाडूतील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. त्यांचा राजकारणातील प्रवेश हा पूर्वनियोजित नव्हता, तर पुरुषप्रधान मानसिकता आणि स्त्रियांविषयीच्या संकुचित विचारांविरुद्ध त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा तो परिणाम होता. २००५ मध्ये विवाहपूर्व संबंधांवर त्यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी ‘डीएमके’मध्ये प्रवेश केला. सध्या त्या भाजपमध्ये असून, काही काळापूर्वीपर्यंत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या होत्या. -
शिवाजी गणेशन
शिवाजी गणेशन हे तामिळ सिनेसृष्टीतील एक दिग्गज स्टार होते, परंतु त्यांना एमजीआर यांच्यासारखे राजकीय वलय प्राप्त होऊ शकले नाही. पेरियार ई. व्ही. रामासामी यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. किंबहुना, त्यांच्या एका अभिनयाने प्रभावित होऊन पेरियार यांनीच त्यांना ‘शिवाजी’ हे नाव दिले होते. अण्णादुराई यांनी ‘डीएमके’ पक्ष स्थापन केला तेव्हा शिवाजी गणेशन त्यात सामील झाले, परंतु १९६२ मध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि इंदिरा गांधींनी त्यांना खासदार (MP) केले. १९८८ मध्ये जेव्हा काँग्रेसने ‘एआयएडीएमके’सोबत युती केली, तेव्हा त्यांनी स्वतःचा ‘तमिळगा मुन्नेत्र मुन्नानी’ हा पक्ष काढला. मात्र, वर्षभरानंतर निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्याने त्यांनी आपला पक्ष जनता दलात विलीन केला. -
नेपोलियन
तामिळ चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे नेपोलियन हे त्यांचे काका आणि ज्येष्ठ ‘डीएमके’ नेते के. एन. नेहरू यांच्यामुळे राजकारणात आले. त्यांनी २००१ मध्ये विल्लीवाकम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ‘डीएमके’चे आमदार झाले. त्यानंतरची निवडणूक ते हरले, पण २००९ मध्ये पुन्हा विजयी झाले आणि ‘डीएमके’ सरकारमध्ये मंत्री बनले. पुढे अळगिरी यांचे समर्थक असल्याच्या कारणावरून पक्षाने त्यांना बाजूला केल्यावर, २०१४ मध्ये नेपोलियन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. -
सीमन
सीमन यांनी १९९६ मध्ये एक दिग्दर्शक म्हणून तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, परंतु त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांच्या राजकीय विचारसरणीमुळे ते पूर्णवेळ राजकारणाकडे वळले. २००६ मध्ये त्यांनी ‘डीएमके’ (DMK) युतीसाठी प्रचार केला, ज्यामध्ये ‘पट्टाली मक्कल कात्छी’ (PMK) हा पक्ष देखील सामील होता. २००८ मध्ये एलटीटीई (LTTE) नेते वेलुपिल्लई प्रभाकरन यांची भेट घेतल्यावर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक वेगळे वळण मिळाले. त्यांची भाषणे एलटीटीईच्या बाजूने आणि तमिळांच्या हत्येच्या विरोधात असायची, ज्यामुळे त्यांना ‘एनएसए’ (NSA) कायद्यांतर्गत अटकही झाली होती. २००९ मध्ये त्यांनी इतर कार्यकर्त्यांसह ‘नाम तमिळार कात्छी’ (NTK) या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष सध्या राजकारणात सक्रिय आहे.
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : “पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवली”, ममता बॅनर्जींचा मोठा दावा; ‘वेट अँड वॉच’चं आवाहन!