-
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर (४७) यांचे दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये मंगळवारी पहाटे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कारण, राज्यातून लोकसभेत गेलेले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
बाळू धानोरकर हे मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावचे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
शिवसेनेच्या भद्रावती शहरातील स्थानिक शाखेचे प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख ते २००६ मध्ये जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यांना २००९ साली शिवसेनेने याच क्षेत्रातून उमेदवारी दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
२०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला. परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. तेव्हाचे कॅबिनेट मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचा पराभव केला. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
आमदार असलेले बाळू धानोरकर यांना २०१९ साली काँग्रेसमधून लोकसभेची तिकिट मिळाली. २०१९ मध्ये सर्वत्र मोदींची लाट होती. तसंच, चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. त्यामुळे तेथील खुर्ची आपल्या ताब्यात घेण्याकरता बाळू धानोरकरांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
या मतदारसंघातील भाजपाचे खासदार हंसराज अहीर केंद्रात कॅबिनेट मंत्री होते. परंतु, पक्षसंघटन, वेगवेगळी आंदोलने यामुळे मतदारांच्या मनात धानोरकरांविषयी विश्वास निर्माण झाला. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर यांना ५ लाख १४ हजार ७४४ मते मिळाली, तर बाळू धानोरकरांना ५ लाख ५९ हजार ५०७ मते मिळाली. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले. विविध पक्षात त्यांची मैत्री कायम होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी जवळीक होती. त्यांचा राजकीय प्रवास हा वादळी होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी २०२४ च्या निवडणुकीत वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
स्वतः खासदार झालेले बाळू धानोरकर यांनी विधानसभा मतदारसंघही आपल्याच ताब्यात राहावा याकरता वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उभं केलं. तसेच भद्रावती नगर परिषदेत सलग १५ वर्षापासून एकहाती सत्ता कायम ठेवली. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-
खासदार बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होईल. (फोटो – बाळू धानोरकर/फेसबूक)
-

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट