ठाणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची चिन्हे दिसत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदार पुत्राने भाजपच्या वाटेने निघालेल्या शरद पवार यांच्या पक्षाच्या सात नगरसेवकांना शेवटच्या क्षणी आपल्या पक्षात ओढावुन घेतल्याने या राजकीय नाट्याची आणि भाजपशी असलेल्या सुप्त संघर्षाची जोरदार चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली.
कळवा, मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेले हे नगरसेवक मागील तीन महिन्यांपासुन भाजपच्या संपर्कात होते. महापालिका निवडणुका जाहीर होताच या नगरसेवकांना पक्षात घ्यायचे अशी रणनिती भाजपकडून आखली गेली होती. मात्र शिंदे यांनी भाजपचा हा डाव उलटून लावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात, शिंदे सेनेच्या तुलनेत जास्त आमदार असूनही ठाणे जिल्ह्यात भाजपला कोणी जुमानत नाही असेच चित्र होते. ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ बदलापुर, कल्याण, डोंबिवली या सारख्या शहरांमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये वरचेवर संघर्ष होताना पाहायला मिळतो. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येताच जिल्ह्यातील भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
वनमंत्री गणेश नाईक, आमदार किसन कथोरे यांनी वेळोवेळी शिंदेसेनेसोबत संघर्ष पुकारल्याचे पाहायला मिळते. ठाण्यात यापुढे फक्त कमळ अशी घोषणा करत गणेश नाईक यांनी शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान दिले आहे. या पार्श्वभुमीवर भाजपच्या वाटेने निघालेल्या कळव्यातील सात नगरसेवकांना ऐनवेळी आपल्या पक्षात घेत शिंदे यांनी भाजपला पुन्हा एकदा धोबीपछाड दिल्याचे पाहायला मिळत आहे.
अजित पवार आणि भाजपला हुलकावणी
कळवा, मुंब्रा हा विधानसभा मतदारसंघ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाने लढविला होता. या ठिकाणी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड मोठ्या फरकाने विजयी झाले असले तरी महापालिका निवडणुकांच्या गणितात कळव्यातील नगरसेवकांचे समिकरण महत्वाचे मानले जात होते. हे गणित लक्षात घेऊन भाजपने या ठिकाणी जितेंद्र आव्हाड समर्थक असलेल्या नगरसेवकांवर जाळं टाकून ठेवल होत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कडवे समर्थक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संपर्कात हे नगरसेवक असल्याची चर्चा होती. कल्याण लोकसभेच्या राजकारणात रविंद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यात विस्तव ही जात नाही. चव्हाण यांची खेळी अंतिम टप्प्यात जात आहे हे लक्षात येताच दोन दिवसांपुर्वी वेगाने पाऊले उचलत आव्हाड समर्थक सात माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत, शिंदे पितापुत्रांनी भाजपला तर धक्का दिलाच शिवाय हा मतदारसंघ बांधण्यासाठी हालचाली करणाऱ्या अजित पवार गटालाही वेसण घातल्याचे पाहायला मिळत आहे. या नगरसेवकांना पक्षात घेत असताना भविष्यात कामांची हमी, इमारतींच्या पुर्नविकासांचे आश्वासन आणि त्यांची पुरेशी तजवीज केल्याचीही चर्चा रंगली आहे.
नव्या कळव्यासाठीच हा निर्णय. इतके दिवस आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात काम केले. आव्हाड यांना विकासाची दृष्टी होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन नव्या कळव्याची पाया भरणी केली जात आहे. कळव्याच्या विकासासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. – मिलिंद पाटिल, माजी नगरसेवक( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)