लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १९८४च्या शीखविरोधी दंगलीत काँग्रेस पक्षाच्या चुका कबूल केल्या आहेत. दंगली घडल्या तेव्हा ते उपस्थित नव्हते, मात्र काँग्रेस पक्षाने भूतकाळात केलेल्या सर्व चुकांची जबाबदारी घेण्यास तयार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अमेरिकेतल्या ब्राउन विद्यापीठात वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेयर्स इथे झालेल्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान त्यांनी एका शीख व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्या शीख व्यक्तीने राहुल गांधींशी भाजपाच्या विधानावरून चर्चा केली. भाजपाच्या सत्तेत भारत कसा असेल आणि भाजपाच्या काळात शिखांना कडा घालण्याची किंवा पगडी घालण्याची परवानगी असेल का, याबाबत चर्चा झाली.

“भाजपा कसा असेल याबाबत तुम्ही शीख लोकांमध्ये भीती निर्माण करता. तुम्ही राजकारण कसे निर्भय असावे याबाबत बोललात. आम्हाला फक्त कडा घालायचा नाही. आम्हाला फक्त पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे; जे भूतकाळात म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या काळात नव्हते”, असे या शीख व्यक्तीने म्हटले आहे. सरस्वती विहार परिसरात दंगलीदरम्यान बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचा त्या व्यक्तीने उल्लेख केला. “पक्ष अशा नेत्यांना का वाचवत आहे”? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. “तुमच्यामध्ये चुका स्वीकारण्याची परिपक्वता नाही. सज्जन कुमार यांच्यावर सध्या खटला सुरू आहे आणि असे अनेक जण काँग्रेसमध्ये आहेत”, असेही तो म्हणाला.

या व्यक्तीला उत्तर देताना राहुल गांधी यांनी सांगितले की, त्यांनी भाजपा राजवटीत भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
“मी जे विधान केले होते ते असे होते की, आपल्याला असा भारत हवा आहे का जिथे लोकांना आपला धर्म सांगण्यात अस्वस्थता वाटेल? काँग्रेस पक्षाच्या चुकांबद्दल सांगायचे तर त्यापैकी बऱ्याच चुका मी तिथे नसताना घडल्या आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाने इतिहासात केलेल्या सर्व चुकांची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. “मी जाहीरपणे सांगितले की, ८०च्या दशकात जे घडले ते चुकीचे होते. मी अनेकदा सुवर्ण मंदिरात गेलो आहे. भारतातील शीख समुदायाशी माझे खूप चांगले संबंध आहेत”, असेही राहुल गांधी यांनी पुढे सांगितले. ब्राउन विद्यापीठातील या सत्रादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजपाची प्रतिक्रिया

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या संभाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. “शीख व्यक्तीने राहुल गांधीजींना त्यांच्या शेवटच्या अमेरिकेच्या भेटीदरम्यान केलेल्या निराधार भीतीची आठवण करून दिली. राहुल गांधींची आता फक्त भारतातच नाही तर जगभरात थट्टा केली जात आहे हे अभूतपूर्व आहे”, असे मालवीय यांनी म्हटले. दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग यांनी म्हटले की, “परदेशात जाऊन भारत आणि शिखांचा अपमान करणारे राहुल गांधी, जेव्हा सत्याला तोंड देण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी माघार घेतली. हा फक्त एक व्हिडीओ नव्हता, हा शीख समुदायाच्या वेदना, राग आणि न्यायासाठीच्या आक्रोशाचा आवाज आहे. राहुल गांधी जे म्हणाले तो माफीनामा नव्हता तर राजकीय ढोंग होते. त्यांचे मौन, त्यांची टाळाटाळ आणि गुन्हेगारांना संरक्षण, हाच गांधी कुटुंबाचा खरा चेहरा आहे.”

“राहुल गांधी खरोखरच या हत्याकांडाची जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी जगदीश टायटलर आणि कमलनाथ यांना काँग्रेस पक्षातून तात्काळ काढून टाकावे”, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींचे २०२४ मधील वक्तव्य

सप्टेंबर २०२४ मध्ये राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमादरम्यान भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या परिस्थितीवर शिखांचे उदाहरण देऊन मोठा वाद निर्माण केला होता. व्हर्जिनियातील भारतीय डायस्पोराच्या सदस्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “भारतातील लढा हा शीख म्हणून एखाद्या व्यक्तीला भारतात पगडी घालण्याची परवानगी देईल की नाही, तसंच गुरुद्वाराला भेट देऊ शकेल का याबाबत शंका आहे.”

१९८४ ची शीखविरोधी दंगल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९८० च्या दशकात इंदिरा गांधी सरकारने पंजाबमध्ये फुटीरतावादी चळवळ दडपली. कट्टरपंथी धर्मोपदेशक जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखालील ही चळवळ होती. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या जर्नेलसिंग याची भारतीय सैन्याने शीख धर्माच्या सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या ठिकाणी हत्या केली. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केली. त्यानंतर भारत सरकार आणि शीख समुदाय यांच्यातला तणाव वाढला. शीखविरोधी दंगली उसळल्या, यामध्ये हजारो शीख लोक मारले गेले. या दंगलीचा प्रभाव सर्वात जास्त दिल्ली आणि कानपूर इथे होता.
२०१३ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १९८४ मध्ये चार हजारांहून अधिक शीख लोकांच्या हत्येबद्दल संसदेत माफी मागितली होती. त्यानंतर तत्कालीन पक्षप्रमुख सोनिया गांधी यांनीही दंगलीबाबत खेद व्यक्त केला. राहुल गांधी यांनीही त्यांच्या भावनांशी सहमत असल्याचे त्यावेळी सांगितले.