बाळासाहेब जवळकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांची हजारो लोकांसमोर अक्कल काढल्यानंतर त्याचे पडसाद उमटून मावळातील राजकारण बरेच तापले आहे. पवारांच्या वादग्रस्त धरण वक्तव्याची पुन्हा आठवण करून देत मावळातील शेतकऱ्यांवर १२ वर्षापूर्वी झालेल्या गोळीबाराचे आदेश अजित पवारांनीच दिले होते, असा आरोप करत भाजपनेही उट्टे काढले. जागेचे तथा शरीराचे ‘शुध्दीकरण” यावरून भाजप-राष्ट्रवादीकडून एकमेकांवर तिखट शेरेबाजी झाली.

तळेगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी ( ३ जून) अजित पवारांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने मावळ राष्ट्रवादीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तुडुंब गर्दीने भरलेल्या जनसभेत बोलताना अजित पवारांनी, स्वपक्षीय आमदार सुनील शेळके यांचे भरभरून कौतुक केले. गेल्या २५ वर्षात पक्षवाढीसाठी जे इतरांना जमले नाही, ते शेळके यांनी करून दाखवले, अशी पाठ थोपटली. त्याचवेळी शेळके यांच्याकडून पराभूत झालेल्या भाजपच्या बाळा भेगडे यांच्यावर पवारांनी टीका केली. राज्यमंत्री असूनही त्यांना मतदारसंघातील कामे करता आली नाहीत. तालुक्यासाठी निधी आणता आला नाही. मंत्री असला म्हणून काय झाले, निधी आणण्यासाठी अक्कल असावी लागते, अशा आशयाचे विधान अजित पवारांनी बाळा भेगडे यांना उद्देशून केले होते.

नेमके तेच भाजपच्या स्थानिक नेतेमंडळींच्या भलतेच जिव्हारी लागले. परिणामी दुसऱ्याच दिवशी, या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आंदोलन केले. ज्या ठिकाणी अजितदादांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. तेथे गोमूत्र शिंपडून शुध्दीकरण करण्यात आले. मावळात येऊन मावळवासियांचीच अक्कल काढू नका, असा इशारा बाळा भेगडे यांनी दिला. धरणात मूत्रविसर्जन करण्याची भाषा करणाऱ्यांनी दुसऱ्याला अक्कल शिकवू नये. अजित पवारांना खरोखर ‘अक्कल’ असती तर, त्यांच्या बारामती मतदारसंघातील १८ गावांमधील शेतकऱ्यांवर ५० वर्षांपासून पाणी न मिळण्याची वेळ आली नसती. पवारांनी त्या गावांना पाणी मिळवून द्यावे, मग इतरांची अक्कल काढावी, अशी बोचरी टीका भेगडे यांनी अजित पवारांवर केली.

ही शाब्दिक चकमक दोघांमध्येच थांबली नाही. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी त्याही पुढे जाऊन, २०११ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांवरील गोळीबार व तीन शेतकऱ्यांच्या मृत्यूला अजित पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप केला. पवारांसारख्या अपवित्र व्यक्तीच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करणे हेच आक्षेपार्ह आहे, असे सांगून प्रशासकीय स्वरूपाच्या कार्यक्रमात पवारांनी राजकीय भाषणबाजी केल्याचा आरोप करत जिल्हाध्यक्षांनी त्यांचा निषेध केला.

भाजपचे हे सारे सूडनाट्य पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके अजितदादांच्या समर्थनार्थ समोर आले. तळेगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी अजितदादांनी ४० कोटी व मावळातील रस्त्यांसाठी ३० कोटी रूपये उपलब्ध करून दिले. मावळातील जवळपास १८५ कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ अजित पवारांच्या हस्ते करण्यात आला. भाजप नेत्यांना नेमकी हीच गोष्ट सहन झाली नसावी. त्यामुळेच २०११ च्या शेतकरी आंदोलनाचा जुनाच विषय त्यांनी पुन्हा उकरून काढला. अजितदादांवर टीका करणारे हेच भाजप नेते २०१६ मध्ये त्यांच्यासमवेत मांडीला मांडी लावून बसले होते, हे समस्त मावळवासियांनी पाहिले आहे, याचा कदाचित त्यांना विसर पडला असावा. ‘राजकीय स्टंटबाजी” आणि ‘चमकोगिरी”साठी भाजपचे राजकारण सुरू आहे, अशी टीका आमदार शेळके यांनी केली. याव्यतिरिक्त, मूत्र शिंपडून जागेचे शुध्दीकरण करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी त्याचे प्राशन करावे, जेणेकरून त्यांचे शरीर शुध्द होईल. त्यादृष्टीने एखाद्या आंदोलनाचा विचार करावा, असा तिखट प्रतिहल्ला सुनील शेळके यांनी चढवला. राष्ट्रवादी-भाजपच्या या शब्दयुद्धामुळे मावळातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.