समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नुकताच अमेठी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी ट्विट करत अमेठीतून सपा निवडणूक लढविणार असल्याचे सुतोवाच केले. मागच्या चार निवडणुकांमध्ये या मतदारसंघात सपाने आपला उमेदवार उभा न करता काँग्रेसला मदत केली होती. मात्र २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी केलेले सुतोवाच हे काँग्रेसपासून फारकत घेण्याचे संकेत आहेत का? अशी चर्चा राष्ट्रीय राजकारणात आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेठीमधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. केरळमधील वायनाड या मतदारसंघातून राहुल गांधी लोकसभेत गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी अमेठीचा दौरा केल्यानंतर अखिलेश यादव यांनी एक ट्वीट केले. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “अमेठीतील गरीब महिलांची दुर्दशा पाहून मला दुःख वाटले. याठिकाणी नेहमीच व्हिआयपी निवडणूक जिंकत आले किंवा पराभूत होत आले आहेत. तरीही इथे असे हाल असतील तर बाकी प्रदेशाची काय चर्चा करणार. पुढच्यावेळेस अमेठी ‘मोठ्या लोकांना’ नाही तर ‘मोठ्या मनाच्या लोकांना’ निवडून देईल. समाजवादी पक्ष अमेठीचे दारिद्र्य संपविण्याचा निर्धार करत आहे.”

सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले की, मागच्यावेळी काँग्रेसचा अमेठीमध्ये पराभव झालेला आहे. त्यामुळे आता ही जागा काँग्रेसची नाही. भाजपाने विजय मिळवल्यामुळे ही जागा त्यांची आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष ही जागा लढविणार आणि २०२४ मध्ये भाजपाचा पराभव करणार. काही दिवसांपूर्वीच सपाने २०२४ साठी काँग्रेस किंवा बहुजन समाज पक्ष यासारख्या पक्षांसोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. याउलट राष्ट्रीय लोक दलाशी विद्यमान आघाडी कायम ठेवू, असेही त्यांनी सांगितले होते.

अमेठीमधील समाजवादी पक्षाच्या नेत्याने अखिलेश यादव यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी या मतदारसंघाचा दौरा करून येथील सर्व माहिती जाणून घेतली. येथील सामाजिक आणि जातनिहाय गणिते काय आहेत, याबद्दलही त्यांनी प्रश्न विचारले. याचा अर्थ निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याचे हे प्राथमिक पाऊल असू शकते, अशी शक्यता अमेठीतील नेत्याने व्यक्त केली.

सपाने १९९९ साली अमेठीची निवडणूक लढविली होती. त्यावेळी सोनिया गांधी आपली पहिली निवडणूक याच ठिकाणाहून लढवत होत्या. सोनिया गांधी यांना ६७ टक्के मतदान झाले होते, तर सपाचे उमेदवार कररूजम फौजी यांना फक्त २.६७ टक्के मतदान मिळाले होते, तसेच ते चौथ्या स्थानी होते. २००४ साली अमेठीतून राहुल गांधी निवडणुकीसाठी उभे होते. त्यांचीही ती पहिलीच निवडणूक होती. यावेळी मात्र सपाने राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नाही आणि राहुल गांधी यांचा विजय झाला.

राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार दिला नसला तरी सपाने रायबरेलीमधून सोनिया गांधी यांच्याविरोधात मात्र निवडणूक लढविली. मात्र तिथेही सपाचा पराभव झाला. सपा उमेदवार रायबरेलीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. २००९ अणि २०१४ मध्ये मात्र सपाने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी आपला उमेदवार दिला नाही. दोन्ही वेळेस येथे राहुल आणि सोनिया गांधी यांचा विजय झाला.

२०१९ ची लोकसभा निवडणुकीत सपाने बसपा आणि राष्ट्रीय लोक दलासोबत आघाडी केली होती. याही वेळेस सपाच्या आघाडीने अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवार दिला नाही. मात्र अमेठीमधून राहुल गांधींना स्मृती इराणी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तर रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडून आल्या. प्रवक्ते चौधरी यांनी रायबरेलीबाबत आगामी निवडणुकीसाठीचा पक्षाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगितले.

काँग्रेसनेही सपाला त्याचप्रकारची मदत केलेली दिसून येते. २०१४ साली सपाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव यांनी मैनपुरी आणि आझमगड दोन ठिकाणाहून निवडणूक लढविली होती. काँग्रेसने मैनपुरी येथे उमेदवार दिला नव्हता, पण आझमगडमध्ये त्यांनी उमेदवार दिला. तसेच कनौजमध्ये अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्यासाठी काँग्रेसने आपला उमेदवार दिला नाही. त्याचप्रमाणे २०१९ सालीदेखील काँग्रेसने मुलायमसिंह यांच्याविरोधात मैनपूरी, अखिलेश यांच्या विरोधात आझमगड, कनौजमध्ये डिंपल आणि अखिलेश यांचा चुलत भाऊ अक्षय यादव याच्या फिरोजाबाद या मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले नाहीत. त्यापैकी मुलायमसिंह आणि अखिलेश यांचा विजय झाला. तर डिंपल आणि अक्षय यादव पराभूत झाले.

अखिलेश यांच्या ताज्या भूमिकेवर बोलत असताना यूपी काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की, जेव्हा जेव्हा सपाने अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिला नाही, तेव्हा तेव्हा काँग्रेसनेदेखील त्याच वचनाची पुर्तता केलेली आहे. यादव कुटुंबीयांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे केले नाहीत. अखिलेश सध्या करत असलेला दावा हा निवडणूकपूर्व तयारीचा भाग असू शकतो. पण आम्हाला आशा आहे की, निवडणुकीच्या वेळेस मात्र विरोधकांमध्ये एकजूट असेल.

लोकसभा निवडणुका या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढाव्यात, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. मात्र यातील मुख्य अडचण अशी आहे की, या विरोधी गटाचे नेतृत्व कोण करणार? यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळेच इतर विरोधी पक्षांप्रमाणेच सपादेखील स्वतःला चाचपडून पाहत आहे. अलीकडेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे पत्र पाठविले होते. (यामध्ये काँग्रेसची स्वाक्षरी नव्हती) तसेच तामिळनाडूतील डीएमकेने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मेळाव्यालादेखील सपाने हजेरी लावली होती. काँग्रेस वगळता अनेक पक्षांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती.

सपा आणि काँग्रेसने २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी निवडणुकपुर्व आघाडी केली होती. त्यांनी एकत्र प्रचार करत असताना राहुल आणि अखिलेश ‘युपी के लडके’ अशी घोषणा दिली होती. मात्र या निवडणुकीत सपा-काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला होता. भाजपाने मोठ्या बहुमतासहीत विजय मिळवला. सपाने ३११ जागा लढवून ४७ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने ११४ जागा लढवून केवळ सात जागी विजय मिळवला होता. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे दोघांनाही निवडणुकीत मोठा फटका बसला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav says samajwadi party field candidate from amethi in lok sabha 2024 alliance with the congress will end kvg
First published on: 08-03-2023 at 16:47 IST