नांदेड : महाराष्ट्रातील शिवसेनेतील फुटीचे साक्षीदार बनलेले आसाममधील कामाख्या मंदिर नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांनी तेथे दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. तथापि भेट देणार्‍यांपैकी कोणीही त्या भागातील ‘डोंगार, झाडी’ किंवा निसर्गसौंदर्याचे वर्णन अद्याप केलेले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशासाठी मात्र त्यांनी सतीदेवीला साकडे घातल्याचे सांगण्यात आले.

नांदेड जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी सभापती सर्वश्री शिवराज पाटील होटाळकर, संजय पाटील कर्‍हाळे, संजय बेळगे, तसेच अ‍ॅड.नीलेश पावडे, श्रीनिवास मोरे यांच्यासह माजी आमदार दिवंगत केशवराव धोंडगे यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे हे मागील काळात राजकीय किंवा बिगर राजकीय सहलींच्या निमित्ताने विविध प्रांतांतील धार्मिक-पर्यटन स्थळांना गेले, तेव्हा त्याची ना चर्चा झाली ना कोणी दखल घेतली. पण दोन दिवसांपूर्वी वरील चमू हैदराबादमार्गे गुवाहाटीला गेला आणि नंतर त्यांनी कामाख्या मंदिराला भेट दिल्याची माहिती बाहेर आल्यानंतर त्यांची ही वारी चर्चेमध्ये आली आहे.

मागील काही वर्षांत नांदेडमधील राजकीय नेते-कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक गुजरातमधील ‘कुबेर भंडारी’चे वारकरी झाले असल्याचे सबंध जिल्ह्याला वेगवेगळ्या माध्यमांतून कळाले. माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण आणि त्यांच्या परिवाराने ‘कुबेर भंडारी’च्या मासिक वार्‍या केल्यानंतर अमरनाथ राजूरकर यांच्यासह त्यांचे अनेक समर्थकही दर अमावस्येला तेथे दर्शनासाठी जात आहेत. पण चव्हाण किंवा त्यांचा चमू एकत्रपणे कधी कामाख्याला गेल्याचे ऐकिवात नाही.

आसाममधील कामाख्या मंदिर देवीच्या एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. सुमारे पावणेतीन वर्षांपूर्वी शिवसेनेतील फुटीर आमदारांचा मोठा गट सुरक्षिततेसाठी सूरतहून आसामच्या भूमीत गेला. तेथील वास्तव्यात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी आपली राजकीय मोहीम फत्ते करण्यापूर्वी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याची दृश्ये समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजधानीपासून शेकडो मैल दूर असलेल्या या धार्मिक स्थळाला मोठी प्रसिद्धी मिळाली. शिंदे यांच्या त्या वारीमध्ये नांदेडचे तेव्हाचे व विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता. या वारी दरम्यान एका तत्कालीन आमदाराने केलेले तेथील निसर्गाचे वर्णन महाराष्ट्रात खूप गाजले.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मोकळा केला. या निवडणुकांचा बिगूल अद्याप वाजलेला नाही. पण गेल्या अडीच-तीन वर्षांपासून या निवडणुकांची प्रतीक्षा करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साह संचारलेला आहे. नांदेडहून आसामला गेलेल्या वरील कार्यकर्त्यांतील अनेकजणं जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छुक असून ‘कामाख्या’ भेट आणि दर्शनामुळे त्यांचा दौरा समाजमाध्यमांतही चर्चेमध्ये आहे.

नांदेडच्या चमूत असलेल्या अ‍ॅड.नीलेश पावडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही बाबी कळवल्या आहेत. केशवराव धोंडगे यांचे एक नातजावई नरसिंग पवार हे आसाम राज्याच्या प्रशासनातील वरिष्ठ सनदी अधिकारी असून नांदेडहून गेलेल्या सर्वांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.