प्रसाद रावकर/सौरभ कुलश्रेष्ठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहीहंडीच्या निमित्ताने प्रामुख्याने मुंबई व लगतच्या ठाणे व महामुंबई परिसरात राजकीय प्रभाव दाखवण्याची स्पर्धा यंदा अधिक तीव्र झाली असून त्यासाठी भाजप, शिंदे गट व शिवसेनादी राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. केवळ दहीहंडीच नव्हे तर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण कित्येक वर्षांपासून तरुणाईला संघटित करून राजकीय ध्येय साध्य करण्याची संधी ठरले आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेत्यांच्या राजकीय उत्कर्षात हे उत्सव महत्त्वाचे ठरले आहेत. प्रसिद्धी, कार्यकर्ते जोडणे व मतदारांवर राजकीय प्रभाव उमटवण्यात दहीहंडीसह हे सर्व उत्सव महत्त्वाचे ठरतात, हा इतिहास आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय नेते व तरुण राजकीय ध्येयाची हंडी फोडण्यासाठी उत्सवाच्या आयोजनांचे थर रचतात.

मुंबईतील राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या विविध राजकीय पक्षांतील बहुसंख्य नेते मंडळींनी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राजकारणाचा श्रीगणेशा केला. छगन भुजबळ यांच्यापासून सचिन अहिर, बाळा नांदगावकरांपर्यंत अनेकांनी उत्सवांच्या शिडीवरून राजकारणात प्रवेश केला.

मुंबई-ठाण्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव हा काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ एक सण होता. दहीहंडी फोडून, चित्ररथांच्या माध्यमातून संदेश देत उत्सव साजरा केला जात होता. दहीहंडी उत्सवाचे महत्त्व आणि जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी ओळखून शिवसेनेच्या अनेक शाखांनी सुरुवातीस आपली गोविंदा पथके मुंबईत सुरू केली. परिसरातील आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांसाठी राजकीयदृष्टीने ती पर्वणी ठरली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानेही अशीच संधी राजकीय मंडळींना उपलब्ध करून दिली.

एकेकाळी माझगाव परिसरात दबदबा असलेले छगन भुजबळ यांनी दक्षिण मुंबईमधील अंजीर वाडीतील गणेशोत्सवात समाजकार्याला सुरूवात केली. मात्र भुजबळांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर शिवसेनेने माझगावमधील शाखाप्रमुख बाळा नांदगावकर यांना त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. दहीहंडी, गणेशोत्सवाच्या माध्यमातून बाळा नांदगावकर यांचा माझगावमध्ये दांडगा जनसंपर्क होता. त्याच जोरावर त्यांनी ज्येष्ठ नेते असलेल्या भुजबळ यांचा पराभव केला. माझगाव ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदामध्ये नांदगावकर सक्रिय होते. कालौघात मनसेचा जन्म झाला आणि ते मनसेवासी झाले. मग या गोविंदा पथकाला शिवसेनेचे यशवंत जाधव यांचे पाठबळ मिळाले. गणेशोत्सवात त्यांचाही सक्रिय सहभाग होता. मुंबईमधील ठिकठिकाणची गोविंदा पथके, गणेशोत्सव मंडळांना सढळहस्ते मदत करत बॅनरच्या रुपात प्रसिद्धी मिळवत काँग्रेस नेते भाई जगताप राजकारणात सक्रिय झाले. आमदार आणि आता मुंबई अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास उत्सवांच्या आधारानेच झाला आहे.

ठाण्यात दहीहंडीच्या सांस्कृतिक उत्सवाला मोठे स्वरूप देण्याचे आणि त्यास प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे काम केले ते जितेंद्र आव्हाड यांनी. संघर्ष या त्यांच्या संस्थेतर्फे होणारी दहीहंडी ही प्रसारमाध्यमांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. त्यातून हजारो लोकांची आणि गोविंदा पथकांची गर्दी संघर्षच्या दहीहंडी उत्सवाला होऊ लागली. त्यातून तरुणाईला आकर्षित करण्याचे कौशल्य जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे अशी त्यांची ख्याती पसरली आणि आव्हाडांचे राजकीय प्रस्थ वाढण्यास नक्कीच मदत झाली. तरुण कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात त्यातून जोडले गेले. त्यानंतर ठाण्यातच प्रताप सरनाईक यांनी दहीहंडी उत्सवातून आपले प्रभाव क्षेत्र विस्तारले व तेही प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रामुख्याने २००८-०९ मध्ये मराठी वृत्तवाहिन्यांची संख्या वाढल्यावर त्यांच्यासाठी दिवसभर दाखवण्याचा दहीहंडीचा उत्सव एक आयती संधी ठरली. वृत्तवाहिन्यांच्या या गरजेचा उपयोग स्थानिक नेत्यांनी, आमदारांनी संधी म्हणून केला. त्यामुळेच तोवर उपनगरात, शहरात, जिल्ह्यात माहिती असलेले महामुंबई परिसरातील अनेक स्थानिक नेते वाहिन्यांच्या त्या थेट प्रक्षेपणातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले व त्यांना ओळख मिळाली. त्याचा लाभ त्यांना राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाला.  

दहीहंडी व राजकीय समीकरणे याबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, दहीहंडीचा उत्सव मी सुरू केला तो राजकारणासाठी नाही तर तरुणाईला आवडणारा सांस्कृतिक उपक्रम म्हणून. संघर्षच्या हंडीचे आयोजन, कार्यक्रमाची व्यवस्था यामुळे गोविंदा पथकांसाठी आणि तरुणांसाठी ते एक मोठे आकर्षण झाले. हजारोंची गर्दी होऊ लागली. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा असलो तरी पूर्वीपासून गोविंदा पथकांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा होता. पण मी जाणीवपूर्वक पक्षीय राजकारण त्यातून बाजूला ठेवले. गोविंदा पथक कोणत्याही पक्षाचे असो आम्ही त्यांचे स्वागतच केले. संघर्षची दहीहंडी पाहून इतर नेत्यांनी कदाचित राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून तसे आयोजन केले असेल व त्यातून राजकीय हेतू साध्य केला असेल मला त्यावर फारसे बोलायचे नाही, असेही आव्हाड म्हणाले. 

ठाण्यामध्ये लाखमोलाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी मुंबईतील पथकांची धावपळ सुरू झाली होती. त्याच वेळी राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव सुरू केला आणि ठाण्याला जाण्यापूर्वी मुंबईतील समस्त गोविंदा पथके वरळीमध्ये हजेरी लावू लागली. या दहीहंडी उत्सवामुळे सचिन अहिर प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आले. वरळीमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी हाच उत्सव त्यांच्या कामी आला होता.

एकेकाळी शिवसेनेत असलेले आणि आता काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले संजय निरुपम यांचा अंधेरीतील दहीहंडी उत्सव प्रसिद्ध झाला होता. अगदी दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरांतील गोविंदा पथके आवर्जून त्यांच्या उत्सवातील मानाची दहीहंडी फोडण्यासाठी अंधेरीला जात होती. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या मतदारसंघात चांगलीच बांधणी केली होती.शिवसेना नेते दगडू सकपाळ यांचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चांगलाच दबदबा होता. लालबागचा राजा नावारुपाला आला आणि सकपाळ यांचेही राजकीय वजन वाढत गेले.

गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेतील पांडुरंग सकपाळ, ताडदेवमधील अरुण दुधवडकर, भाजपचे रोहिदास लोखंडे, बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे अशा अनेकांनी दहीहंडी उत्सवाचा आधार घेत आपापल्या मतपेढ्या जपल्या. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन यंदा अनेक माजी नगरसेवक आपापल्या प्रभागांमध्ये छोटेखानी स्वरुपात उत्सवांचे आयोजन करीत मतदारांवर छाप पाडण्यात दंग आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All political parties are trying to grab political advantage from all festivals print politics news pkd
First published on: 19-08-2022 at 18:18 IST