गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आम आदमी पक्षाने (आप) योजना आखायला सुरुवात केली आहे. आपने गुजरातवर लक्ष केंद्रीत केले असून पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत. ते येथील छोटे व्यापारी, उद्योजक यांच्याशी संवाद साधत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमध्ये आप पक्षाकडून १० दिवसांचा एक कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आप पक्षातर्फे गुजरातमधील उद्योजक, व्यापारी यांच्याशी संवाद साधला जात आहे. या मोहिमेत केजरीवाल यांनीदेखील उत्स्फूर्तपणे भाग घेतला असून ते या लोकांशी बोलत आहेत. त्यांनी नुकतेच अहमदाबाद येथे उद्योजक, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. याआधी त्यांनी सौराष्ट्रातील राजकोट आणि जामनगर जिल्ह्यांमध्ये उद्योजकांशी संवाद साधला होता.

हेही वाचा >> शिंदे सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणारी मदत दुप्पट!

राजकोटमध्ये केजरीवाल यांनी उद्योजक, व्यापाऱ्यांना अनेक आश्वासने दिली आहेत. आप पक्ष सत्तेत आला तर येथील व्यापाऱ्यांतील भीतीचे वातवरण संपवण्याचे काम केले जाईल. व्यापारी जगतात काम करणाऱ्या लोकांना सन्मानाने वागवले जाईल, भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोहीम राबवली जाईल. प्रलंबित असलेल्या व्हॅट रिबेट याचिका सहा महिन्यांत निकाली काढण्यात येतील. जीएसटी करप्रणाली सुलभ करण्यात येईल, अशी आश्वासने आप तसेच अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यापाऱ्यांना दिली होती. विशेष म्हणजे व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असलेल्या सल्लागार समितीची स्थापना करून येथील व्यापारी आणि उद्योजकांना सरकारमध्ये सामावून घेतले जाईल, असेदेखील आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.

हेही वाचा >> मंत्रीपद मिळताच मंगलप्रभात लोढा ‘शिवतीर्थवर,’ राज ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट, कोणत्या विषयांवर चर्चा?

केजरीवाल यांनी ५ ऑगस्ट रोजीदेखील जामनगर येथे व्यापारी, उद्योजकांशी संवाद साधत ‘रेड राज’ (raid raaj) संपवण्यात येईल असे सांगत वरील सर्व आश्वासनांची पुनरावृत्ती केली होती. या ‘टाऊन हॉल’ चर्चांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आपने केला आहे. “गुजरातमध्ये व्यवसाय तसेच उद्योगांना भरभराटी आली आहे, असा दावा भाजपाकडून केला जातो. मात्र आमच्या कार्यक्रमांना मिळणाऱ्या प्रतिसादातून भाजपाचा हा दावा पोकळ असल्याचे स्पष्ट होते,” असे आप पक्षाच्या गुजरात व्यापार शाखेचे अध्यक्ष शिवलाल बरासिया यांनी सांगितले.

हेही वाचा >> “हे धोका देणाऱ्यांचं राज्य” बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपाची प्रतिक्रया, शेलार म्हणाले “लोकशाहीत बोलण्याचा अधिकार पण…”

“आम्ही आयोजित करत असलेल्या बैठकांना एमएसएमई क्षेत्रातीलच नव्हे तर ५ लाखांपासून ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल असणारे उद्योजक उपस्थित राहत आहेत. गरीब लोकांना मोफत सुविधा देण्याचे आमिष दाखवून आप पक्ष लोकांना आकर्षित करत असल्याचा आरोप विरोधक करू शकतात. मात्र असा दावा हास्यास्पद आहे. आम्ही घेत असलेल्या बैठकांमुळे उद्योगपती, व्यापारीच नव्हे तर राज्यातील गरीबांनादेखील सरकारच्या धोरणांमुळे किती त्रास सहन करावा लागत आहे, हे समोर येत आहे,” असेही शिवलाल बरासिया यांनी सांगितले.

हेही वाचा >> त्रिपुरा: तृणमूल कॉंग्रेसला करावा लागतोय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष

“समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बुलंद करण्याचे आपचे उद्दीष्ट आहे. याच कारणामुळे आमचा अजेंडा क्षेत्रानुसार रोज बदलत आहे. राजकोट आणि जामनगरमध्ये आम्ही व्यावसायीकांबद्दल बोललो. तर छोटा उदेपूर येथे आम्ही पक्षाची आदिवासी समाजाबद्दलची भूमिका मांडली. आगामी काळात आम्ही शेतकऱ्यांबद्दल आमची भूमिका मांडू,” असेदेखील बरासिया यांनी सांगितले.

हेही वाचा >> विधानसभा निवडणूक तोंडावर असताना त्रिपुरा राज्यात तृणमूल काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह समर्थकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आप पक्षाकडून जनतेला प्रलोभन दिले जाते. पक्षाकडून लोकांना मोफत सुविधांचे आमिष दाखवले जाते, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. याला प्रत्युत्तर म्हणून आपने भाजपाला लक्ष्य केले आहे. गुजरातमध्ये भाजपाने जन्माष्टमी आणि दिवाळी सणासाठी शेंगदाणा तेलावर ५० टक्के अनुदानाची घोषणा केली आहे. सरकारच्या या योजनेंतर्गत सरकारला १२४ कोटी रुपये खर्ची करावे लागणार आहेत. तसेच या योजनेचा लाभ ६.५ कोटी लोकांना होणार आहे. गुजरातमधील सरकारच्या या योजनेवर आपने निशाणा साधला आहे.

हेही वाचा >> महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर!

तसेच गुजरात सरकारवर असणाऱ्या कर्जावरदेखील आपचे राष्ट्रीय सहसचिव इसुदान गढवी यांनी भाष्य केले आहे. “गुजरात सरकारवर सध्या ३.२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. म्हणजेच गुजरातमध्ये जन्माला येणारे प्रत्येक मूल डोक्यावर ५३ हजार रुपयांचे कर्ज घेऊन जन्मते. भाजपाकडून आप पक्षाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र यामध्ये त्यांचेच नुकसान होत आहे,” अशी टीका गढवी यांनी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: App party focus on gujarat for upcoming assembly election arvind kejriwal taking meeting with businessman prd
First published on: 10-08-2022 at 19:22 IST