लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना : जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात वर्णी लागली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक आता मंत्रिमंडळाच्या आगामी विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या खेपेस लोणीकर यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. मराठवाड्यात ‘वॉटरग्रीड’सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी ते आग्रही होते. या वेळेसही पहिल्या टप्प्यातच त्यांना मंत्रीपद मिळेल यासाठी त्यांचे समर्थक आशावादी होते. परंतु प्रत्यक्षात मात्र पुढच्या विस्ताराची वाट पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काही उरले नाही.

ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचणारे लोणीकर प्रामुख्याने परतूर आणि मंठा तालुक्यांत भाजपचा प्रमुख चेहरा आहेत. अलीकडच्या काही वर्षांत तर या दोन तालुक्यांत लोणीकर आणि भाजप हे पर्यायवाची शब्द असल्यासारखे झाले आहेत. प्रारंभी गावपातळीवर राजकारण करणाऱ्या आणि कोणताही राजकीय वारसा नसलेल्या लोणीकरांची जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदा ओळख झाली ती १९९० मध्ये. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यावेळचे काँग्रेसचे विद्यमान मातब्बर आमदार कै. वैजनाथराव आकात यांच्याविरुद्ध प्रचाराच्या साधनांची वानवा असतानाही निवडणूक लढविली. या निवडणुकीत लोणीकर पराभूत झाले. परंतु त्यांना २८ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावला. या निवडणुकीपर्यंत परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अस्तित्व नसल्यासारखेच होते. १९८५ मध्ये भाजपला या मतदारसंघात उमेदवारही उभा करता आला नव्हता. त्याआधी १९८० मध्ये भाजपने उमेदवार दिला होता, परंतु त्याला जेमतेम दोन हजार ७०० मते पडली होती.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

१९९२ मध्ये स्वतंत्र जालना जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये लोणीकर सदस्यपदी निवडून आले. तेव्हापासून गेली तीन दशके ते जिल्ह्याच्या राजकारणात आपले अस्तित्व ठेवून आहेत. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोणीकर ताकदीनिशी उतरले. परंतु काँग्रेस उमेदवाराकडून फक्त २२२ मतांनी पराभव झाला. परंतु पराभव झाला तरी लोणीकर डगमगले नाहीत आणि १९९९ मध्ये ४८ हजारांपेक्षा अधिक मते मिळवून ते पहिल्यांदा विधानसभा सदस्य झाले. त्यानंतर २००४ मध्येही ते विधानसभेवर निवडून आले. २००९ मध्ये अपक्ष उमेदवार जेथलिया यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पुन्हा २०१४ आणि २०१९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांशी संघर्ष करीत आमदारकीसोबतच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था इत्यादी राजकारणात ते सक्रिय राहत आले आहेत. गैरकारभाराच्या मुद्द्यांवरून जिल्ह्यातील अनेक पुढाऱ्यांशी त्यांनी आक्रमक संघर्षाचा पवित्रा अनेकदा घेतलेला आहे. त्यांनी आपला मुलगा राहुल यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकारणात उतरवलेले आहे. राहुल लोणीकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदीही राहिलेले आहेत. परतूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी बबनराव लोणीकर यांनी आपल्या पत्नीस भाजपची उमेदवारी दिली होती. परंतु तेथे त्यांचा काँग्रेसकडून पराभव झाला.

हेही वाचा… Anand Dighe Death Anniversary: “…नाही राजकारण”; आनंद दिघेंच्या स्मृतिदिनानिमित्त CM शिंदेंनी पोस्ट केलेली चारोळी चर्चेत

आक्रमक पद्धतीने एखादा विषय मांडण्याचा लोणीकर यांचा स्वभाव आहे. त्यामुळे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समिती असो, की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका असो; त्यामधील त्यांच्या भाषेची चर्चा नेहमीच होत राहिलेली आहे. पक्षीय पातळीवर आंदोलनांमध्ये सहभागी असणारे लोणीकर अथकपणे प्रसिद्धीमाध्यमांच्या संपर्कात असतात.

विरोधी पक्षांशी संघर्ष करताना त्यांना स्वत:च्या पक्षातही संघर्ष करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील भाजपमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्याचप्रमाणे आमदारद्वय संतोष दानवे आणि नारायण कुचे यांचा वावर एकत्रितरीत्या दिसतो. परंतु एकेकाळी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राहूनही लोणीकर यांचे अस्तित्व मात्र स्वतंत्र राहिल्याचा अनुभव पक्षसंघटना अथवा शासकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा आलेला आहे. परंतु तीन दशकांपेक्षाही अधिक काळ राजकारणात सक्रिय राहून चार वेळेस आमदार पदावर निवडून आलेल्या लोणीकर यांची पहिल्या टप्प्यात मंत्रीपदी वर्णी लागली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babanrao lonikar waiting for next cabinet expansion print politics news asj
First published on: 26-08-2022 at 11:23 IST