राज्यातील झालेले सत्तांतर आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदा गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर गट आरक्षण केले आहे. यावेळी ३ हजार ४६६ जादा गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून यापैकी १,९०० हून अधिक गाड्या गट आरक्षणाच्या आहेत. गट आरक्षणांमध्येही यावेळी ७५० हून अधिक गाड्या शिवसेना, भाजप, मनसेकडून आरक्षित करण्यात आल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ठाण्यातील लोकप्रतिनिधींकडूनच ५०० गाड्यांचे गट आरक्षण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ मुंबईतून भाजपही एसटी आरक्षित करण्यात आघाडीवर आहे.

गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावेळी गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे जाणाऱ्यांचे प्रमाण अधिकच आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचे तिकीट उपलब्ध होत नाही आणि पलीकडे खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनीही तिकीट दरात मोठी वाढ केली अशी स्थिती आहे. परिणामी अनेकांनी एसटीने कोकणात जाण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे यंदा नियमित गाड्यांबरोबर जादा गाड्यांचेही आरक्षण मोठ्या प्रमाणात झाले आहे. एसटी महामंडळाने २,५०० जादा गाड्या सोडण्याची घोषणा केली होती. मात्र ३ हजार ४६६ जादा गाड्या आरक्षित झाल्या आहेत. यापैकी १,९०० गाड्या गट आरक्षणाच्या असून राजकीय पक्ष, तसेच आमदार, नगरसेवक, प्रवासी संघटना, स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे यांनी त्या आरक्षित केल्या आहेत.

मुंबई तसेच ठाण्यासह अन्य महानगरपालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी गट आरक्षण केले जात असल्याची चर्चा आहे. त्याआधीच शिवसेनेत मोठी उलथापालथ झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शिवसेनेतील एका गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळेही सेनेतील या गटासोबत असलेल्या लोकप्रतिनिधींनी यावेळी आघाडी घेऊन अनेक एसटींचे गट आरक्षण केले आहे. ठाण्यातून शिवसेनेकडून ५०० गाड्यांचे गट आरक्षण करण्यात आले आहे. तर ठाण्यातील मनसेकडूनही १०० हून अधिक गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. भाजपने दहापेक्षा अधिक गाड्या प्रवाशांसाठी सोडल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मुंबईत भाजपने १५० गाड्या गट आरक्षण म्हणून आरक्षित केल्या होत्या. मात्र ऐनवेळी त्यातील १९ गाड्या रद्द केल्यानंतर १३१ गाड्या कोकणासाठी रवाना केल्या जाणार आहेत. भाजपकडून दक्षिण मुंबईतील काही भागातून तसेच सायन, चेंबूर, अगदी मुलुंड, वांद्रे पासून बोरीवलीपर्यंत या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गट आरक्षणाची प्रक्रिया काय?

गाड्यांचे गट आरक्षण करण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा प्रवासी संघटना, अन्य मंडळे एसटी महामंडळाशी संपर्क साधतात. जादा गाड्या कोणत्या मार्गावर सोडणार, किती गाड्यांची गरज इत्यादी माहिती महामंडळ त्यांच्याकडून घेते आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होताच गाड्या चालकासह उपलब्ध केल्या जातात. यासाठी महामंडळ त्या- त्या मार्गावरील तिकीट दराप्रमाणे सर्व आसनांचे पैसे घेऊन गाड्या गट आरक्षणासाठी उपलब्ध करते.

यंदा एसटीने कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक

मार्च २०२० आणि २०२१ या वर्षात करोनामुळे अनेकांना गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाता आले नाही. त्यामुळे यंदा एसटीने कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अधिकच आहे. दीड लाखांहून अधिक जण कोकणाकडे रवाना होणार आहेत. २०१९ मध्ये २ हजार ३८० जादा गाड्यांचे आरक्षण झाले होते. तर ११ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले होते. यंदा जादा गाड्यांची हीच संख्या ३ हजार ४६६ पर्यंत पोहोचली आहे.