महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत जोडो’ यात्रा राजकीय नसल्याचा दावा असला तरी, काँग्रेसला राजकीय लाभ मिळू शकतो का?

रमेश- राजकीय लाभासाठी काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढलेली नाही. देशापुढे तीन गंभीर आव्हाने असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणामुळे निर्माण झालेली आहेत. आर्थिक विषमता वाढत असून पंतप्रधानांच्या पाठिंब्यामुळे एक-दोन उद्योजकांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर कब्जा केला आहे. धर्म, जात, भाषेच्या नावाखाली सामाजिक ध्रुवीकरण होत आहे. विभाजनवादी प्रवृत्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. सगळे राजकीय-प्रशासकीय निर्णयांचे अधिकार पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांच्या हातात एकवटलेले आहेत. या तीन आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ‘भारत जोडो’ यात्रा काढलेली आहे. उदयपूर चिंतन शिबिरामध्ये ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला गेला. देशातील भीती आणि द्वेषाच्या वातावरणाविरोधात मानसिक कणखरपणा आणि ठोस वैचारिक भूमिकेतून युद्ध लढावे लागणार आहे. हे युद्ध म्हणजे निवडणुकीची लढाई नव्हे, वैचारिक संघर्ष आहे.

यात्रेचे स्वरुप ‘एनजीओ’सारखे असून ही राजकीय पक्षाने काढलेली यात्रा नाही, असा आरोप केला जातो…

रमेश- काही सामाजिक संघटना व एनजीओशी निगडीत लोकही यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. पण, ही एनजीओंनी काढलेली यात्रा नाही. यात्रेत सामील झालेल्या एनजीओवाल्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला नव्हता, उलट, ते विरोधात होते. पण, काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे आता त्यांना कळले आहे. यात्रेमध्ये एनजीओ आहेत तसेच, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते असे सगळेच सामील झाले आहेत. यात्रेत काँग्रेस समर्थक आणि विरोधक दोन्हीही येतात. पण, तिसरा गट आहे, जो ना समर्थक आहे, ना विरोधक. त्यांनी काँग्रेससोबत जायचे की, नाही हे अजून ठरवलेले नाही. इतकी मोठी यात्रा जगभरात एकाही राजकीय पक्षाने काढलेली नाही. यात्रेवर टीका केली जात असली तरी भाजप घाबरलेला आहे, ही बाब नजरेआड कशी करता येईल?

हेही वाचा : हिमाचल प्रदेशवर पाणी सोडत ‘आप’ने लक्ष केंद्रीत केले गुजरातवर

भाजपला प्रत्युत्तर देण्याचे धोरण काँग्रेसने बदलले आहे का?

रमेश- काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक झाला नाही तर, आम्हाला भाजप नष्ट करेल. त्यामुळे ज्या भाषेत ते आमच्यावर शाब्दिक हल्लाबोल करतात, त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ. गेल्या दहा वर्षांपासून भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक होऊन हल्लाबोल केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसला सक्रिय होण्याची गरज आहे. काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम केले जात होते, त्यांना अपमानित केले जात होते. पण, त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले गेले नाही. आम्ही मनातून हरलो तर, आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. आम्ही निवडणुकीत पराभूत होणार असे मानले तर आम्ही कधीही विजयी होऊ शकत नाही. भाजपविरोधातील लढाई हरलो असे म्हणू लागलो, लढाई आधीच पराभव मान्य करू लागलो तर, लढाई कधीही जिंकता येणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ द्यायला हवेतील गारवा, त्यांना लढण्यासाठी प्राणवायू पुरवला पाहिजे, बुस्टर डोस दिला पाहिजे. समाजमाध्यमांवर काँग्रेसने भाजपविरोधात आक्रमक प्रत्युत्तर दिले तर, तो कार्यकर्त्यांसाठी प्राणवायू ठरतो.

हेही वाचा : ‘भारत जोडो’ यात्रेत अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी?

भाजपविरोधी पक्षांना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढलेली नाही, असे तुम्ही म्हणाला होता. हे विधान तुलनेत वादग्रस्त ठरले…

रमेश- काँग्रेस पक्ष संन्यासी नव्हे, एनजीओही नाही. आम्ही राजकीय पक्ष आहोत. पक्षाला मजबूत बनवले पाहिजे, हा आमचा हक्क आहे. काँग्रेसनेच स्वतःला बळकट केले पाहिजे. अन्य पक्षांना मजबूत करण्यासाठी काँग्रेस काम करत नाही. काँग्रेस मजबूत झाला तरच विरोधी पक्ष मजबूत होतील. मजबूत काँग्रेसशिवाय विरोधकांचे ऐक्य होऊ शकत नाही.

रमेश- काँग्रेस पक्षाकडे नेत्यांची उणीव नाही. महाराष्ट्रात नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आहेत. अनेक तरुण नेतेही काँग्रेसकडे आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले. भाजपला एकही जागा मिळाली नाही. काँग्रेसच्या यशाबद्दल प्रसारमाध्यमे लिहीत नाहीत. हा पक्ष समाजाचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. देशाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब काँग्रेसमध्ये उमटते. स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीमध्ये काँग्रेसचे योगदान कोणी नाकारू शकत नाही. निवडणुकीत जय-पराजय दोन्ही गोष्टी होत असतात. १९७७ मध्ये रायबरेलीतील मतदारांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पराभूत केले होते. पण, १९८० मध्ये त्याच मतदारांनी त्यांना विजयी केले होते. लोकांचा दृष्टिकोन (परसेप्शन) काय यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आता लोकांना काँग्रेस रस्त्यावर उतरली असल्याचे दिसले आहे. काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढली आहे, राहुल गांधी नेतृत्व करत असून लोकांशी थेट संवाद साधत आहेत. द्वेषाची नव्हे तर सद्भावना, शांतीची भाषा राहुल गांधी बोलत आहेत. त्याचा परिणाम कधी ना कधी दिसेलच.

हेही वाचा : राहुल गांधींनी निकाला आधीच गांधी घराण्याची पसंती खरगे असल्याचे अप्रत्यक्षपणे केले होते सूतोवाच

भारत जोडो’ यात्रा उत्तरेकडे निघाली असून या राज्यांमध्ये काँग्रेसची थेट लढत भाजपशी होत असते. २०१९ लोकसभेत काँग्रेसला फारसे यश आले नाही. या यात्रेमुळे चित्र बदलले का?

रमेश- लोकसभा निवडणुकीत जागा किती मिळतील, यादृष्टीने काँग्रेस यात्रेकडे बघत नाही. शंकराचार्यांनी केरळपासून काश्मीरपर्यंत यात्रा काढली होती, ते देशभर फिरले होते. ८ व्या शतकात भक्ती चळवळीची सुरुवात झाली आणि देशाला सामाजिक सुधारणांकडे घेऊन गेली, त्यादृष्टिकोनातून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेकडे बघितले पाहिजे.

ही यात्रा काँग्रेसला निश्चितपणे राजकीय लाभ मिळवून देईल, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना असली तरी ती वास्तवात उतरेल का?

रमेश- राजकीय लाभ झाला तर चांगलेच आहे. पण, भविष्यात काय होईल, यावर मी भाष्य करणार नाही. पण, निवडणुकीसाठी काँग्रेस यात्रा काढेल, असे मला कधीही वाटले नाही. या यात्रेत निवडणुकीचा प्रचार होत नाही, तशी भाषा देखील कोणी वापरलेली नाही. पक्षामध्ये नवी आशा, नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केरळ, तामीळनाडू, कर्नाटकमध्ये लोकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. जिथे ही यात्रा जाणार नाही तिथे, स्थानिक यात्रा काढली जाईल. आसाम, ओदिशा, पश्चिम बंगालमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यात्रा निघेल. ‘भारत जोडो’ला मिळालेल्या प्रतिसादानंतर कर्नाटकमध्ये भाजपनेही तिथे ‘संकल्प यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला. यात्रेचा परिणाम फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांवरच नव्हे तर, संघावरही होऊ लागला आहे. आता सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रय होसबोळे, नितीन गडकरी, बाबा रामदेव अशा अनेकांची भाषा बदलू लागली आहे!

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

महाराष्ट्रात यात्रेसाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनालाही निमंत्रण दिले आहे…

रमेश- गेल्या २० वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. महाराष्ट्रात आम्ही एकत्रितपणे सरकारे चालवली आहेत. ‘यूपीए’ सरकारमध्ये शरद पवार कृषीमंत्री होते. त्यांचा आम्ही सन्मान करतो, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल तेव्हा ते आमच्या स्वागतासाठी येणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jodo yatra rahul gandhi rss language change jairam ramesh congress bjp print politics news tmb 01
First published on: 19-10-2022 at 17:04 IST