नांदेड : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार काय, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयासमोरील प्रकरणांच्या अंतिम निर्णयानुसार होणार असला, तरी जिल्ह्यातील भाजपच्या चार आमदारांतून किमान एकाला मंत्री म्हणून संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे करत खासदार चिखलीकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशोक चव्हाण पायउतार झाल्यानंतर नांदेडला मंत्रिमंडळात स्थान नाही हे चित्र दिसू नये यासाठी चिखलीकर धडपड करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आमदार सर्वश्री डॉ.तुषार राठोड, राम पाटील रातोळीकर, राजेश संभाजी पवार आणि भीमराव केराम यांना एकत्र आणून फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी नांदेडला मंत्रिपद मिळावे यासाठी आग्रह धरण्यात आला. तथापि या भेटी संदर्भात पाचही जणांनी काही दिवस गोपनीयता राखली. आता मात्र या भेटीचे छायाचित्र समोर आले आहे. फडणवीस यांनी वरील प्रस्तावावर नेमके काय आश्वासन दिले, ते समोर आले नसले, तरी या चौघांतून ‘बाजीराव’ कोण होणार, यासाठी कार्यकर्त्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे!

‘बाजीराव’ म्हणजे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री (कै.) बाजीराव शिंदे. १९८०-८५ दरम्यान महाराष्ट्रात तीन मुख्यमंत्र्यांची तीन सरकारे जनतेने पाहिली. याच काळात नांदेड जिल्ह्यातून बाजीराव शिंदे यांना अचानक राज्यमंत्रिपद मिळाले होते. १९७८ सालचे इंदिरानिष्ठ म्हणून बाजीरावांना तेव्हा लाल दिवा मिळाला होता; पण त्यांचे हे मंत्रिपद अल्पकालीन ठरले होते. नंतर (कै.) गंगाधर कुंटूरकर हेही आमदारकीच्या पहिल्या कारकीर्दीत राज्यमंत्री झाले. जिल्ह्यातून त्यानंतर नव्वदच्या दशकात मधुकरराव घाटे, भास्करराव खतगावकर, डॉ.माधव किन्हाळकर व अशोक चव्हाण हे चौघे पाच वर्षांच्या कालावधीत राज्यमंत्री झाले होते. पुढे १९९७-९८ च्या दरम्यान सेना-भाजप युतीच्या राजवटीत भाजपचे डी. बी. पाटील यांचीही राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. त्यानंतरच्या सुमारे २५ वर्षांत नांदेड जिल्ह्याने एकही काँग्रेसेतर मंत्री पाहिला नाही.

हेही वाचा- भाजप नेतृत्वाच्या निरोपाची प्रतीक्षा करत मुख्यमंत्री शिंदे १२ तास महाराष्ट्र सदनातील दालनात बसून

१९९९ ते २०२२ पर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात बहुतांश काळ काँग्रेसच्या ‘अशोक पर्व’ चा घनगर्द प्रभाव राहिला; पण आता काँग्रेस आणि चव्हाण दोघेही सत्तेबाहेर गेल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पक्षाचे चारही आमदार मानाच्या नि अधिकाराच्या मंत्रिपदासाठी आपापल्या कुवतीनुसार, स्वतंत्रपणे प्रयत्नात होतेच. त्यानंतर खासदार चिखलीकर यांनी त्यांना एकत्र आणत फडणवीस यांच्यापुढे हजर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाबाबत उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी

भाजपमध्ये व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा, पक्षकार्य याचा विचार करून राजकीय संधी देण्याचा प्रघात होता. अलीकडे या पक्षाचे काँग्रेसीकरण झाले आहे. याच काँग्रेसच्या संस्कृतीतील चिखलीकर यांना भाजपतील मंत्रिपदासाठी शिफारस करण्याचा ‘मान’ प्रथमच मिळाला आहे. खुद्द चिखलीकर हे २०१४ ते २०१९ दरम्यान मंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र, शिवसेनेने त्यांना डावलले. मग ते भाजपत गेले अन् थेट खासदार झाले. तूर्त त्यांना दिल्लीमध्ये संधी नाही. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांकडील जिल्ह्याचे पालकत्व जिल्ह्यातल्याच भाजप आमदाराकडे आले पाहिजे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही आपल्याला बळ मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ते गेल्या दहा दिवसांपासून मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री शिंदे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, राजकीय घडामोडी यांत व्यग्र असतानाही त्यांनी गेल्या आठवड्यात नांदेडमधील महत्त्वाच्या कामासंदर्भात एक बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी कल्याणकरांमागे बळ उभे करण्याचा संदेश दिला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp pratap patil chikhalikar trying for atleast one bjp minister from nanded print politics news rmm
First published on: 19-07-2022 at 20:12 IST