केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या  तेलंगणातील मुनुगोडे येथील दौऱ्याच्या एक दिवस अगोद तेलंगणामधील सत्ताधारी पक्षाने शक्ती प्रदर्शन केले. राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांनी स्वतः तिथे जाऊन पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तेलंगणातील मुनुगोडे येथे काँग्रेस नेते के राज गोपाल रेड्डी यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. हैदराबादमधील हजारो समर्थकांच्या ताफ्याचे नेतृत्व करून केसीआर यांनी विधानसभा मतदारसंघात आपला प्रचार सुरू केला. 

अजूनही या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. मात्र तरीसुद्धा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. मतदानाच्या तारखा निश्चित होण्याआधीच राज्यातील सर्व मोठे नेते प्रचारात उतरले आहेत.  यावरून सर्व पक्षांसाठी या निवडणुकीचे महत्त्व किती आहे हे कळू शकते.केएसआर यांनी जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर  देशाची मालमत्ता गहाण ठेवल्याचा आणि “शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

“मोदी सरकार सर्व  शेतात पाण्याचे मीटर बसवण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहे. मी त्यांना ठणकावून सांगितले की मी मरेन पण आमच्या शेतकऱ्यांवर बोजा पडणार नाही. हे नियोजनबद्ध षडयंत्र आहे. ते वीज आणि खतांच्या किमती वाढवतील आणि पीक खरेदी करणार नाहीत, ज्यामुळे शेतकर्‍यांना जगणे कठीण होईल. पैशांनी भरलेल्या सूटकेस असलेले व्यापारी येतील आणि तुमच्या जमिनी विकत घेतील. मोदी सरकारने विमानतळ, रस्ते, बँका विकल्या आहेत. विकण्यासाठी काहीही उरले नाही, म्हणून ते शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मागे येतील.” असं ते म्हणाले.