सतीश कामत

माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश यांनी रविवारी खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी भरपूर गर्दी जमवून उत्तम वातावरणनिर्मिती केली खरी, पण मुख्यमंत्र्यांच्या विस्कळीत भाषणामुळे ही ‘उत्तर सभा’ अगदीच निष्प्रभ ठरली.

Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गेल्या ५ मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील गोळीबार मैदानावर सभा झाली. निमित्त होतं राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशाचं. पण राज्यात सत्तांतरानंतर ठाकरे प्रथमच कोकणात येत येणार होते. विशेषतः शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे आमदार चिरंजीव योगेश यांचा खेड हा गृह तालुका असल्यामुळे या सभेच्या माध्यमातून कोकणातील त्यांच्याशी निष्ठावान राहिलेल्या शिवसैनिकांना ठाकरे काय संदेश देतात, याबाबत उत्सुकता होती. त्या सभेत ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे गद्दारीचा मुद्दा लावून धरत, आगामी निवडणुकीत यांना संपवा, असा थेट आदेश दिला. त्यामुळे डिवचले गेलेल्या रामदास कदम यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याच ठिकाणी ‘उत्तर सभा’ होईल, असं जाहीर करून त्या दृष्टीने ते चिरंजीव योगेशसह कामालाही लागले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणामध्ये शिरकाव करण्याच्या दृष्टीने आणखी एक संधी, म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या रविवारी या ठिकाणी हजेरी लावली. अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून कदम पिता-पुत्रांनी सभेला भरपूर गर्दी जमा केली. मैदानात आणि भवतालीही सर्वत्र लोकांची दाटी झाली होती. आता या वातावरणाचा लाभ उठवत चौकार, षटकार मारण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची होती. त्या दृष्टीने त्यांनी भाषणाच्या सुरवातीला राजकीय सूर चांगल्या प्रकारे लावला. पातळी ढळू न देता उद्धव ठाकरे यांचा तथाकथित नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचारावर बोट ठेवत त्या पक्षातून बाहेर पडण्याशिवाय काहीही पर्याय कसा शिल्लक राहिला नव्हता, हे त्यांनी पुन्हा एकदा ठसवण्याचा प्रयत्न केला. पुनरावृत्ती असली तरी हे बोलणं लोक लक्ष देऊन ऐकत होते.

हेही वाचा… जतमध्ये आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले

पण त्यानंतर ‘आपलं सरकार’ने गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये राज्यातील जनतेसाठी किती विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत, हे मुख्यमंत्री सांगू लागले आणि इथूनच त्यांची सभेवरची पकड निसटली. कारण हे मुद्दे त्यांनी कागदावर लिहून आणले होते. त्यामध्ये पुनरावृत्ती होती आणि ते वाचताना अडखळत भाषण करत होते. दोन आठवड्यांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खरं तर या सभेत श्रोत्यांना राजकीय जुगलबंदीची अपेक्षा होती. पण त्याऐवजी शिंदे यांनी विकासाची रटाळ कॅसेट लावल्याने रामदासभाईंच्या शैलीला सरावलेले श्रोते काहीसे कंटाळले. शेवटी शेवटी तर कोकणच्या विकास योजनांचा विषय आल्यावर त्यांनी माईकवरूनच, अरे तो कोकणच्या योजनांचा कागद कुठे गेला, असं विचारलं. मग कोणीतरी तो कागद पुढे सरकवला आणि यापूर्वीच्या कोकण दौऱ्यांमध्ये सांगितलेली योजनांची जंत्री शिंदे यांनी पुन्हा वाचून दाखवली. शिवाय, व्यासपीठावर पाठीमागे बसलेले रामदासभाई, आठवण करून देतील तशी त्यात भर टाकत गेले. मंडणगडला एमआयडीसी त्यांनी अशाच प्रकारे अचानक जाहीर करुन टाकली आणि शेवटी तर, रामदास कदमांनी आपले आमदार पुत्र योगेश यांच्याविषयी बोलायला सांगितलं. बहुतेक त्यांना मंत्रीपदाची घोषणा अपेक्षित होती. पण मी योगेशच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, इतकंच सांगून मुख्यमंत्र्यांनी तो विषय संपवला. जाता जाता, आमच्याकडेही खूप ‘मसाला’ आहे, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला. पण प्रत्यक्षात त्याची थोडीसुद्धा चव श्रोत्यांना चाखायला मिळाली नाही.

हेही वाचा… बच्चू कडू, रवी राणा यांचे भवितव्य काय ?

सभेच्या संयोजनातला आणखी एक ढिसळपणा म्हणजे, राज ठाकरे यांनी लोकप्रिय केलेला ‘लाव रे तो व्हिडिओ’चा प्रयोग शिंदे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेच्या काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या गेल्या. पण एकूण कार्यक्रमाला उशीर होत आहे असं वाटल्यामुळे की काय, मुख्यमंत्र्यांनी त्या मध्येच बंद करायला लावल्या आणि स्वतः भाषण करायला उठले. त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि अपेक्षित परिणाम साधण्याऐवजी हा प्रयोग कोणाच्या सांगण्यावरून होता, याबाबतची चर्चा रंगली. तसंही हल्ली नव्याने आघाडी झालेल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल संबंधित राजकीय नेते पूर्वी काय बोलले, हे जनता फार गंभीरपणे घेत नाही. (खुद्द शिंदे यांचीही भाजपावर टीका केलेली व्हिडिओ क्लिप मध्यंतरी फिरत होती.

हेही वाचा… Maharashtra News Live : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: बुकी अनिल जयसिंघानीला अटक

मुख्यमंत्री शिंदे यांचा रत्नागिरी जिल्ह्याचा गेल्या चार महिन्यातला हा तिसरा दौरा. यापूर्वी गेल्या डिसेंबर महिन्यात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी शहरात भव्य मेळावा आयोजित केला. मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर शिंदे तेव्हा प्रथमच कोकणात आले होते. सामंत यांनीही उत्तम गर्दी जमवली होती. पण त्याही वेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण प्रभावहीन झालं होतं. गेल्या रविवारी खेडमधील सभेच्या निमित्ताने त्यांनी जिल्ह्यात तीन महिन्यांत तिसऱ्यांदा हजेरी लावली. ही ‘उत्तर सभा’ असल्याने ठाकरे यांच्या सभेच्या गर्दीशीही या सभेच्या गर्दीची तुलना झाली. दोन्ही सभा साधारणपणे सारख्याच गर्दीच्या झाल्या. पण हल्ली गर्दी जमवण्याचं तंत्र विकसित झालं आहे. त्यामुळे त्यातून फार काही अंदाज येत नाही. अशा परिस्थितीत आलेल्या गर्दीला सभेचे मुख्य वक्ते काय संदेश देतात, कशा प्रकारे प्रभावित करतात हेच महत्त्वाचं ठरतं. या सभेद्वारे ठाकरेंना ‘करारा जबाब मिलेगा’ असं बॅनरद्वारे जाहीर करून मुख्यमंत्र्यांच्या सभेबाबत उत्सुकता निर्माण केली होती. त्यांचे चिरंजीव योगेश यांनी ‘निष्ठावान शिवसैनिकांचा एल्गार’ अशी घोषणा केली होती. पण तसं काही घडलं नाही. किंबहुना, मुख्यमंत्र्यांपेक्षा या सभेत कदम पिता-पुत्रांनी थोडक्यात केलेली भाषणं जास्त आक्रमक, जमलेल्या श्रोत्यांना अपेक्षित अशी झाली. खरं तर विधिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री चुरचुरीत, चिमटे काढत, टोमणे मारत छान बोलतात. अशा जाहीर सभांमधून मात्र ते तितके प्रभावी ठरत नाहीत, हे रत्नागिरीतील लागोपाठ तीन कार्यक्रमांमधून अनुभवाला आलं आहे. कोकणातला ठाकरेंचा मतदार आपल्याकडे खेचायचा असेल तर त्यांनी यापेक्षा वेगळी शैली आत्मसात करण्याची गरज आहे.