उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, लखनऊचे माजी महापौर आणि भाजपाचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. शर्मा यांनी शनिवारी न्यायव्यवस्थेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत टाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनीदेखील भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याबाबत टिप्पणी करत पक्षाला अडचणीत आणले होते.
दिनेश शर्मा यांचे वक्तव्य
“जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले तेव्हा त्यामध्ये विधिमंडळ आणि न्यायपालिकेचे अधिकार, वर्णन स्पष्ट होते याबाबत लोकांमध्ये शंका आहे. भारतीय संविधानानुसार, कोणीही लोकसभा आणि राज्यसभेला निर्देशित करू शकत नाही आणि एकदा राष्ट्रपतींनी मान्यता दिली की त्यांना कोणीही आव्हान देऊ शकत नाही. कारण राष्ट्रपती सर्वोच्च आहेत,” असे वक्तव्य शर्मा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पक्ष अडचणीत आला असून पक्षाने त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले.
निशिकांत दुबे यांचं वक्तव्य
याआधी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनीदेखील भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. “देशात जेवढे गृह युद्ध होत आहेत त्याला फक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालय आपल्या चौकटीपल्याड जात नाही. सर्वोच्च न्यायालयाची सीमा काय आहे की संविधानानुसार जे कायदे आहेत त्यांचं पालन करणं. जर प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर मग संसद, विधानसभा यांना काहीच अर्थ नाही, त्या बंद करून टाका”, असे वक्तव्य दुबे यांनी केले होते.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे निर्देश
भाजपाच्या खासदारांनी केलेल्या अशा उथळ वक्तव्यांमुळे पक्षाने त्यांच्यापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत सांगितले की, “खासदार दिनेश शर्मा आणि निशिकांत दुबे यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत आणि सरन्यायाधीशांबाबत केलेल्या वक्तव्यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. मात्र, भाजपा कधीही अशा वक्तव्यांशी संबंध ठेवत नाही आणि अशा वक्तव्यांचं कधी समर्थनही करणार नाही. भाजपाने कायम न्यायव्यवस्थेचा आदर राखला आहे. त्यांच्या आदेश आणि सल्ल्यांना स्वीकारलं आहे. कारण एक पक्ष म्हणून आमचं असं मत आहे की सर्वोच्च न्यायालयासह देशातील सर्व न्यायालये आपल्या लोकशाहीचे अविभाज्य भाग आहेत. तसंच संविधानाच्या संरक्षणासाठी आधारस्तंभ आहेत. मी या दोघांनाही आणि इतरांनाही अशा प्रकारची विधानं न करण्याचे निर्देश दिले आहेत.”
लखनऊ विद्यापीठात वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत दिनेश शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांशी उत्तम समन्वय आणि संपर्क असलेले नेते आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते लखनऊ महानगरचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. तळागाळातून एक वॉर्ड अध्यक्ष म्हणून काम केल्यावर त्यांनी भाजपाच्या युवा शाखेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. १९९८ मध्ये त्यांना उत्तर प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २००४ मध्ये जेव्हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लखनऊमधून लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा शर्मा यांनी त्यांच्या निवडणूक कार्यालयाचे संयोजक म्हणून काम केले होते. तसंच ते निवडणूक व्यवस्थापन समितीचाही भाग होते.
नोव्हेंबर २००६ मध्ये शर्मा यांना राजकारणात मोठी संधी मिळाली. ते लखनऊचे महापौर म्हणून निवडून आले. उच्च जातीय आणि शिया मुस्लिमांच्या लक्षणीय संख्येमुळे लखनऊ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. २०१२ मध्ये शर्मा यांनी पुन्हा महापौरपदाची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली. यावेळी मोठ्या फरकाने (१.७१ लाख मते) जिंकल्याबद्दल त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. २०१४ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते पक्षाचे गुजरात राज्याचे प्रभारी झाले. २०१४ मध्ये लोकसभा जिंकल्यानंतर भाजपाने हाती घेतलेल्या सदस्यता मोहिमेचे ते राष्ट्रीय प्रभारी होते. या मोहिमेमुळे भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शर्मा यांच्या निमंत्रणावरून लखनऊ ऐशबाग इथल्या रामलीला कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
लखनऊच्या महापौरपदी असताना भाजपाने शर्मा यांना आदित्यनाथ मंत्रिमंडळातून उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. त्यावेळी शर्मा यांचे मुस्लिमांशी तसंच मौलवींशी चांगले हितसंबंध असल्याचे दिसून आले. २०२२ मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येताच शर्मा यांच्या जागी दुसरे ब्राम्हण नेते ब्रजेश पाठक यांची आदित्यनाथ मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर २०२३ मध्ये शर्मा यांना राज्यसभेत पाठवण्यात आले.
शर्मा यांनी अविचारी वक्तव्य केल्यानंतर भाजपाने त्यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१८ मध्ये सीता टेस्ट ट्यूब बेबी असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. “आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान राम पुष्पक विमानाने लंकेहून परतले होते. यावरून तेव्हा विमान अस्तित्वात होते हे सिद्ध होते. असे म्हटले जाते की सीतेचा जन्म एका घड्यात झाला होता. म्हणजे रामायणाच्या काळातही आताच्या टेस्ट-ट्यूब बेबीसाखे तंत्रज्ञान होते,” असे शर्मा म्हणाले होते. या वक्तव्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर टीका करत भाषण देताना संयम बाळगण्याचे निर्देश दिले होते.