दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक परंपरा असलेली शिक्षण संस्था राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज स्थलांतर करण्याच्या मुद्द्यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात असंतोष वाढीस लागला आहे. या वास्तूमध्ये यात्री निवास करण्याची पालकमंत्र्यांची संकल्पना असली तरी तेथे हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचे त्यांचे मनसुबे असून ते कोल्हापूरकर उधळून लावतील असे म्हणत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सरकारची नाचक्की मोहीम सुरू झाल्याने तो राज्य सरकारलाही अडचणीचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, त्यालगतचा जुना राजवाडा, भवानी मंडप अशा प्राचीन – ऐतिहासिक परंपरा असलेल्या प्रांगणातच राजाराम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सुरू आहे. येथील विद्यार्थी संख्या सातत्याने घटत चालली आहे. आवश्यक शिक्षक भरती करण्याकडे शाळा प्रशासन, व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शाळा प्रशस्त ठिकाणी स्थलांतरित करून ती पुरेशा शिक्षक- कर्मचाऱ्यांसह सुरू करायची आणि या वास्तूमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यात्री निवास अन्य सुविधा उपलब्ध करण्याचा इरादा पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केला आहे. तथापि त्यांनी शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी अशा कोणालाही विश्वासात न घेता सुट्टीच्या दिवशी पाहणी केली. हा मुद्दा कोल्हापूरकरांच्या नजरेत भरला. त्याचवरून सध्या वाद तापला आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे शिवसेनेचे लक्ष्य

भाविकांना सुविधांची गरज
महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून सतत भाविक येत असतात. त्यांच्या सुविधांसाठी अनेकदा आराखडेही तयार केले आहेत. त्याची पूर्तता होण्याकडे आजवरच्या सर्वच सरकारने दुर्लक्ष केले आहे. भाविकांची दर्शन रांग, निवास हा मुद्दा कायम चर्चेत असतो. या दोन्हीची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंदिरा लगतच्या मेन राजाराम हायस्कूलमध्ये भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्याची संकल्पना योजली आहे. याच हेतूने त्यांनी येथे भेटही दिली होती. पण त्यावरून कोल्हापुरात त्यांच्या विरोधात काहूर उठले आहे. वादात महालक्ष्मी मंदिर व भाविकांच्या सुविधांचा मुद्दा मात्र दुर्लक्षित झाला आहे.

हेही वाचा: काँग्रेसच्या पारंपारिक आदिवासी मतदारांना राहुल गांधी यांची साद

पालकमंत्री केसरकर यांची भूमिका वरकारणी भावणारी असली तरी त्यात सर्वसमावेशकतेचा मोठाच अभाव जाणवत आहे. ही संकल्पना विश्वासात घेऊन करणे अपेक्षित असताना ती ज्या गुपचूपररीत्या सुरू आहे त्यावरून शंका- कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कोकणात असताना केसरकर यांनी जिल्हा परिषदेच्या कागलकर वाडा या जुन्या वास्तूमध्ये हॉटेल सुरू करण्याची संकल्पना बोलून दाखवली होती. या कथित विधानाची सांगड मेन राजाराम हायस्कूल स्थलांतर प्रकरणाशी जोडली जात आहे. परिणामी पालकमंत्र्यांचा उदात्त हेतू हा छुपी पाहणी, पूर्वीचे विधान यामध्ये विरून जावून ते वादाच्या कचाट्यात सापडले आहे.

हेही वाचा: मंत्रिपदाची चर्चा अन् समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर मुख्यमंत्री शिंदे यांची मेहरनजर

पालकमंत्र्यांची भूमिका ही यात्री निवासच्या गोंडस नावाने हॉटेल व्यवसाय सुरू करण्याची आहे. हा त्यांचा हा इरादा कोल्हापूरकर उधळून लावतील. पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम शाहूनगरीने केले असताना येथेच राजर्षी शाहू महाराजांचा विचार, आचार डावलणारे पालकमंत्री आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी करणारी एक लाख पत्रे पाठवली पाठवण्याची मोहीम सुरू झाली आहे. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह विरोधकांनीही रान उठवण्यास सुरुवात केली असताना बाळासाहेबांची शिवसेना व भाजपने सोयीस्कर मौन बाळगल्याने त्यांच्या विरोधातही संताप व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissatisfaction against kolhapur guardian minister deepak kesarkar over rajaram high school relocation print politics news tmb 01
First published on: 21-11-2022 at 17:17 IST