पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या सर्व ८० लोकसभा मतदारसंघात भाजपाने एका खासगी संस्थेकडून सर्व्हे केला आहे. मतदारसंघातील वातावरण पाहून त्याप्रमाणे निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी हा सर्व्हे करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेकडून करण्यात येणारा सर्व्हे पुढील काही महिने सुरूच ठेवला जाणार असून दर तीन महिन्यांनी याचा अहवाल राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाला दिला जाईल. या सर्व्हेतून तीन महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने आपल्या बातमीत नमूद केले आहे. एक म्हणजे भाजपाची मतदारसंघात काय परिस्थिती आहे, दुसरे म्हणजे, मतदारसंघातील लोकांसाठी महत्त्वाचे विषय कोणते आणि विरोधी पक्षांची त्या मतदारसंघातील परिस्थिती, यावर खासगी संस्था लक्ष ठेवून असल्याचे भाजपामधील एका नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले.

सर्व्हे करण्यामागची भूमिका काय?

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत मतदारांच्या काय भावना आहेत, विद्यमान खासदाराच्या कामगिरीवर मतदार समाधानी आहेत का? मतदारसंघात भाजपाचे इतर संभाव्य उमेदवार कोण आहेत? आणि त्या मतदारसंघात विरोधी पक्षाची स्थिती किंवा कामगिरी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला जात आहे.

हे वाचा >> “एके काळी इतरांमध्ये दहशत पसरवणारे आज स्वतः दहशतीखाली आहेत,” योगी आदित्यनाथांचा माफियांना इशारा!

राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ज्या कल्याणकारी योजना राबविल्या त्याबाबत मतदारसंघातील मतदारांचे काय मत आहेत आहे, याचे बिनचूक अंदाज बांधण्यासाठी हा सर्व्हे मदतगार ठरणार आहे. भाजपा खासदाराचा स्थानिक प्रशासनाशी असलेले संबंध, लोकांशी असलेला जनसंपर्क आणि खासदारांना जनतेमध्ये असलेली प्रतिष्ठा याचे मूल्यमापन केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील जातीय आणि सामाजिक गणिते तपासून मतदारसंघात नव्या संभाव्य उमेदवारांचीही माहिती गोळा केली जाणार आहे.

भाजपा सरकारने उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. ज्याचा लाभ कोट्यवधी लोकांना मिळाला आहे. या योजनांचा आढावा गेत असतानाच विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत जनतेला काय वाटते? याचीही माहिती घेतली जाणार आहे.

राम मंदिर, तीर्थक्षेत्र विकासाचे परिणाम पाहिले जाणार

“उदाहरणार्थ, अयोध्येत राम मंदिरत होत आहे. ज्यावेळी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात येईल, तेव्हा त्याचा भव्य-दिव्य असा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरून लोकांचा कल पुन्हा एकदा भाजपाच्या बाजूने झुकेल आणि अँटी-इन्कम्बन्सी काही प्रमाणात कमी होईल. या सर्व्हेमध्ये राम मंदिर आणि इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करत असताना जनतेला त्याबद्दल काय वाटते, हेदेखील जाणून घेतले जाणार आहे. तसेच जागतिक स्तरावर भारताचे वजन वाढत असून सुशासनाचा लोकांच्या मनावर काय परिणाम होत आहे, याचाही अंदाज घेतला जाईल.”, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्यांनी दिली.

भाजपा संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेशी जोडलेल्या एका नेत्याने सांगितले, “आता ज्याप्रकारचा सर्व्हे केला जात आहे, तो निवडणूक जाहीर होईपर्यंत सुरूच असेल. सर्व्हे करणारी संस्था दर तीन महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल. निवडणुकीला दोन महिने उरले असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा अंतर्गत सर्व्हे केला जाणार आहे. खासगी संस्थेने दिलेला अहवाल आणि कार्यकर्त्यांनी गोळा केलेली माहिती या दोघांचे विश्लेषण करून उमेदवार निवडीची अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि निवडणूक प्रचारात कोणत्या मुद्द्यांना स्थान द्यायचे, हेदेखील ठरविण्यात येईल.”

उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष का?

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यातून सर्वाधिक ८० खासदार येतात. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचा घटक पक्ष असलेल्या अपना दलने (एस) दोन जागा मिळवल्या. बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षासोबत आघाडी करून १० जागांवर विजय मिळवला. तर समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा जिंकता आल्या. काँग्रेसने पारंपरिक समजला जाणारा रायबरेली मतदारसंघ राखण्यात यश मिळवले. मात्र अमेठीमधून राहुल गांधी यांचा पराभव झाला.

हे वाचा >> “जे पेराल, तेच उगवेल”, अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी आदित्यनाथ यांची प्रयागराजमध्ये पहिलीच सभा

२०१९ च्या निकालानंतर समाजवादी पक्ष आणि बसपाने आघाडी तोडली आहे. बसपाने यावेळी स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाला यंदा मागच्यावेळेपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याचे राज्यातील भाजपा नेत्याने सांगितले.