आंध्रप्रदेशातील अमलापूरममध्ये नव्याने तयार झालेल्या कोनसीमा जिल्ह्याच्या नामांतराचा वाद चिघळला आहे. कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून ‘डॉ. बी.आर आंबेडकर कोनसीमा’ असे करण्यात आले आहे. या प्रस्तावाला विरोध करत अमलापूर शहरात शेकडो लोकांनी निदर्शने केली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री पिनिपे विश्वरूप यांचे आणि आमदार पोन्नडा सतीश यांची घरे जाळली. यावेळी झालेल्या हिंचारात अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले आहेत. 

कोनासीमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. सुब्बा रेड्डी यांनी सांगितले की, ” जिल्हा मुख्यालयात झालेल्या हिंसाचारात २०० हुन अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. कोनसीमा येथे झालेल्या हिंचारात अनेक वाहने, पोलिसांच्या गाड्या यांचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच राज्याचे परिवहन मंत्री विश्वरूप आणि आमदार पी सतीश यांची घरे जाळण्यात आली आहेत. आंध्रप्रदेशचे पोलीस महासंचालक के.राजेंद्रनाथ रेड्डी म्हणाले की ” कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शेजारील जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी एका गटाने आमच्याकडे परवानगी मागितली होती. पण पोलीस योग्य तपास करत असल्याने आंदोलनाची गरज नाही हे त्या गटाला पटवून दिले. या हिंसाचाराप्रकरणी आम्ही ७ एफआयआर नोंदवले आहेत. अनेक जणांना अटक केली आहे तर काही लोकांना ताब्यात घेतले आहे. 

आधी नामांतराला विरोध आणि नंतर हिंसाचार, यामुळे येथील जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. असे असले तरी  राज्य सरकारने मात्र नंतरचा प्रस्ताव मागे घेणार नसल्याचे ठामपणे संगितले आहे. 

वायएसआरसीपी सरकारने गेल्या महिन्यात नवीन कोनसीमासह १३ नवीन जिल्ह्यांची घोषणा केली होती. राज्य सरकारनी नामांतराबाबत १८ मे रोजी अधिसूचना काढली होती. या नामांतराच्या निर्णयाला अनेक गटांनी आणि समुदायांनी विरोध केला होता. हा जिल्हा पर्यटनाचा जिल्हा असल्यामुळे याचे नाव कोनसीमाच राहू द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. 

प्रादेशिक जातीचे राजकारण बाजूला ठेवले तर स्थानिक राहिवाश्यांच्या एका वर्गाकडून अशीही चिंता व्यक्त केली जात आहे की कोनसीमाचे नाव बदल्यामुळे ” प्रदेशाची पारंपरिक ओळख नष्ट होईल. तुम्ही आंबेडकर जिल्ह्यातील असे म्हटल्यावर इथले भौगोलिक स्थान समजावून सांगावे लागेल.  परंतु कोनसीमा म्हटल्यास तेलगू लोकांनाच नाही तर इतर राज्यातील लोकांनाही ते कळेल”. असे मत येथील सर्वसामान्य राहिवाश्यांनी व्यक्त केले आहे.