-अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात आकारास आलेल्या नव्या सत्ता समीकरणात उत्तर महाराष्ट्र्रातून कुणा कुणाची मंत्री म्हणून वर्णी लागणार, याबद्दल राजकीय पातळीवर तर्कवितर्क लढविले जात आहेत. ठाकरे सरकारमध्ये दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले होते. विद्यमान मंत्री असल्याने नव्या सरकारमध्येही त्यांची पदे कायम राहण्याची शक्यता आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना वजनदार खाते मिळू शकेल. शिवाय, भाजपच्या कोट्यातून नाशिकमधून प्रा. देवयानी फरांदे किंवा सीमा हिरे, धुळ्यातून अमरिशभाई पटेल, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या नावाची चर्चा आहे.

राज्यात सत्तेवरून पायउतार झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला छगन भुजबळ, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि ॲड. के. सी. पाडवी यांच्या रुपाने चार मंत्री लाभले होते. हे सर्व कॅबिनेट मंत्री होते. महत्वाची खाती संबंधितांना मिळाली होती. त्याआधीच्या म्हणजे भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्रातील गिरीश महाजन, एकनाथ खडसे, दादा भुसे, जयकुमार रावल हे मंत्री होते. कालांतराने खडसेंना राजीनामा द्यावा लागला. ही एकंदर स्थिती पाहता नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्राचा हिस्सा वाढणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.

भाजपकडून आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची समीकरणे लक्षात घेऊन मंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. गेल्या वेळी नाशिक महापालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. आगामी निवडणुकीत ती कायम राखण्यासाठी शहरातील भाजप आमदाराचा प्रामुख्याने विचार केला जाईल. नाशिक शहरात भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि ॲड. राहूल ढिकले हे तीन आमदार आहेत. ज्येष्ठतेच्या मुद्यावर मंत्री म्हणून फरांदे किंवा हिरे यांच्यात चुरस राहील. नाशिकमधून मंत्री दिल्याचा लाभ महापालिकेसह लोकसभा निवडणुकीत व्हावा, असा पक्षाचा प्रयत्न असेल. देवळा-चांदवड आणि बागलाण मतदारसंघात भाजपचे आमदार असले तरी ग्रामीण भागात प्रभाव वाढविण्यासाठी भाजपने दिंडोरी मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मालेगाव बाह्यचे दादा भुसे हे विद्यमान मंत्री असल्याने त्यांचे पद कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.

नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणाऱ्या गिरीश महाजन यांना वजनदार खाते निश्चित आहे. यापूर्वीच्या भाजप-सेना सरकारमध्ये महाजन यांच्याकडे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी होती. नाशिकचे पालक मंत्रिपद भूषविताना त्यांनी महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. मागील युती सरकारमध्ये पर्यटन खात्याची जबाबदारी धुळे जिल्ह्यातील जयकुमार रावल यांच्याकडे होती. यावेळी रावल यांना संधी मिळेल की अमरिश पटेल या ज्येष्ठ नेत्याचा विचार होईल, याबद्दल अंदाज बांधले जात आहेत. एकनाथ शिंदे गटातील जळगावचे गुलाबराव पाटील हे महाविकास आघाडी सरकारमंध्ये पाणी पुरवठामंत्री होते. त्यांना कोणते खाते मिळणार, याकडे जळगावकरांचे लक्ष आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many people from north maharashtra will get a place in the new cabinet print politics news msr
First published on: 02-07-2022 at 09:20 IST