अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. प्रीती बंड या उद्धव ठाकरे गटात होत्या, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी बंडखोरी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला काय लाभ मिळेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला स्वत:चे स्थान मजबूत करून घेण्यासाठी अजून बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचा ‘स्ट्राईक रेट’ चांगला असला, तरी अमरावती जिल्ह्यात मात्र या पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. जिल्ह्यात ठाकरे गटाचा एक आमदार आहे. शिंदे गटाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांना पराभूत करून निवडून आलेले गजानन लवटे यांनी शिवसेनेची मशाल जिल्ह्यात पेटती ठेवली, पण इतर ठिकाणी ठाकरे गटालाही यश मिळू शकले नाही.

पक्ष संघटना भक्कम करण्याचे आता दोन्ही गटांचे प्रयत्न आहेत. त्यात आता शिंदे गटाने इतर पक्षातील लोकांना पक्षात सामावून घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

शिवसेना हे माझे घर होते. आपल्याला कुणीतरी परत बोलवावे असे वाटत होते. आपल्या घराची प्रत्येक जण वाट पाहत असतो. पण, विधानसभा निवडणुकीला आता सहा महिने झाले आहेत. आपल्याला आता परत बोलावले जाणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर आपण शिंदे गटात प्रवेश करण्याचे ठरवले, असे प्रीती बंड यांचे म्हणणे आहे. त्यांचा संघर्ष बडनेरा मतदार संघात युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्याशी झाला होता. रवी राणा मात्र महायुतीत आहेत. त्यांचे सख्य भाजपशी आहे. त्यामुळे प्रीती बंड यांच्या पक्षप्रवेशातून शिंदे गटाला कोणता लाभ होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तूळात आहे.

दशकभरापुर्वी माजी खासदार नवनीत राणा यांच्‍या जातवैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उघडलेल्‍या मोहीमेनंतर अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍यात सुरू झालेला वाद अजूनही शमण्‍याची चिन्‍हे नाहीत. अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍य महायुतीत असले, तरी त्‍यांच्‍यात मतैक्‍य होऊ शकलेले नाही. दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ यांना पराभूत करण्यासाठी रवी राणा यांनी प्रयत्न केले, हा आरोप पुन्हा एकदा अडसूळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर केला. महायुतीतील या विसंवादात कार्यकर्ते मात्र अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबड आणि अरूण पडोळे यांच्यातही अनेकवेळा वाद उफाळून आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा खरा कस लागणार आहे.

महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना शिंदे गटाला अजूनही चाचपडावे लागत आहे. भाजपचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत. अजित पवार गटाच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासोबतच त्यांचे पती संजय खोडके हे विधान परिषद सदस्य झाल्याने अजित पवार गटाला बळ मिळाले आहे. त्यांचाही राणा दाम्पत्यासोबत संघर्ष झाला आहे. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपाचा संघर्ष अटळ मानला जात आहे.