महेश सरलष्कर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यामुळे या आघाडीतील घटक पक्षांच्या सदस्यांना शिंदे गट वा भाजपचा रस्ता खुणावू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दुपारपर्यंत दिल्लीमध्ये होते. या भेटीत शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम करण्याचे निश्चित केल्याची चर्चा सुरू झाली. शिंदे यांनाच नव्हे तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व पक्षाचे माजी आमदार राजन पाटील या दोघांनी भेट घेतल्याने फक्त शिवसेनेत फूट पाडण्याचा डाव नसून जमलेच तर महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसचे हात आणि घड्याळही कमकुवत करण्याचा भाजपचा इरादा असल्याचे मानले जात आहे.

जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासारख्या आक्रमक शिवसैनिकाचे जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याशी राजकीय वैर आहे. दानवे यांच्यामुळेच मागील विधासनभा निवडणुकीत खोतकरांचा पराभव झाल्याची टीका झाली होती. त्याच रावसाहेब दानवेंसह खोतकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्यामुळे शिवसेनेला खिंडार पाडण्याचे भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. खोतकरांनी शिंदे यांची भेट घेतली तेव्हा दानवेसह शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील, कृपाल तुमाने, सदाभाऊ लोखंडे अशी शिंदे गटाची फौज उपस्थित होती. मुख्यमंत्री शिंदे सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले होते. हा सोहळा झाल्यानंतर शिंदे व फडणवीस यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. राज्यसभेतील आजी-माजी खासदार उदयनराजे भोसले व संभाजी छत्रपती हेही महाराष्ट्र सदनामध्ये शिंदे-फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले होते.

हेही वाचा… सत्ताबदल होताच बंडखोर शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ, राज्य सरकारकडून अलिबाग-मुरुड शहरासाठी मोठा निधी

सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा आणि मोहोळ या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची ताकद असून तिथेच खिंडार पाडण्याचे भाजपने ठरवलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व पक्षाचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या दोघांनी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये फडणवीस यांची भेट घेतल्याने राजन पाटील हे कमळ हाती घेण्याची शक्यता वाढली आहे. साखर कारखान्यातील कर्ज आणि सूतगिरणी खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणांमध्ये एप्रिलमध्ये सक्तवसुली संचालनालयाने बबनराव शिंदे यांना नोटीस बजावली होती व त्यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे अडचणीत आले असल्याने ते भाजपप्रवेश करू शकतील असे मानले जात आहे. त्यांची दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट झाल्याचे सांगितले जाते. पण, शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे भाजपच्या वाटेवर जाताना आमदार पदाचा त्याग शिंदे यांना सहन करावा लागू शकतो. मोहोळचे भाजपनेते संजय क्षीरसागर यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर, मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याअंतर्गत राजकारणामुळे पाटील भाजपकडे जात असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा.. रामदास कदम यांच्या काळात औरंगाबादमध्ये शिवसेनेत जातीयवादाला खतपाणी अन् एमआयएमशी सलोखा

शिंदे-फडणवीस दिल्लीत असताना सोमवारी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक आयोगाची सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली. आमदार अपात्रता व संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना निवडणूक आयोग निवडणूक चिन्ह व खरी शिवसेना या दोन मुद्द्यांवर सुनावणी घेऊ शकत नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगासमोर ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याआधीच शिवसेना न्यायालयात गेल्यामुळे शिवसेनेला निवडणूक चिन्ह हातून जाण्याची भीती वाटू लागल्याची चर्चा होत आहे.