गोरखा जनमुक्ती मोर्चाने रविवारी झालेल्या गोरखा प्रादेशिक प्रशासन (जीटीए) ची निवडणूक लढवली नाही. मात्र त्यांचे माजी नेते अनित थापा यांच्या भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चाने (बिजीपीएम) निवडणुकीत जोरदार विजय मिळवला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये स्थापन झालेल्या या संघटनेने ४५ पैकी २७ जागा जिंकल्या तर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) ने पाच जागा जिंकून जीटीएमध्ये आपले खाते उघडले. तर ‘हमरो पक्षाने’ आठ जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हमरो पक्षाने’ या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दार्जिलिंग नगरपालिका निवडणुकीतसुद्धा चमकदार कामगिरी केली होती. “हा विजय ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या उत्तर बंगाल हिल्सच्या लोकांना समर्पित आहे.  या भागातील जनतेच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत. आमच्या पक्षाने २७ जागा जिंकल्या आहेत. आता आम्ही मंडळ स्थापन करू,” असे विजयानंतर अनिल थापा यांनी पत्रकारांना सांगितले.  पक्षाचे समर्थन असलेले पाच अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत. या निवडणुकीत नव्या राजकीय संघटनांचे यश ही भाजप आणि जीजेएमसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत दार्जिलिंग जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा भाजपाने जिंकल्या होत्या.मात्र या वर्षाच्या सुरुवातीला दार्जिलिंगसह पश्चिम बंगालमधील नगरपालिका जिंकण्यात पक्षाला यश आले नाही. या निकालावरून असे दिसून येते की दार्जिलिंग हिल्समधील मतदार राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत नवीन आणि अद्याप क्षमता सिद्ध न करू शकलेल्या पक्षांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत.

भाजपाने निकालाबाबत फार काही बोलण्यास नकार दिला. “आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे इतर पक्षांनी निवडणूक जिंकली आहे. हे जनतेच्या आदेशाचे खरे प्रतिबिंब नाही. आमच्या पक्षाला अजूनही दार्जिलिंग हिल्समध्ये मोठा पाठिंबा आहे”. असे भाजपचे सिलीगुडीचे आमदार शंकर घोष यांनी स्पष्ट केले.गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने अनिल थापा यांनी तमांग यांच्या नेतृत्वाखालील जीजेएम गटापासून वेगळे झाले आणि गेल्या सप्टेंबरमध्ये बिजीपीएम ची स्थापना केली. अखेरीस, तमांग यांनी आपला गट टीएमसीमध्ये विलीन केला.

“टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही येथे काही जागा जिंकल्या. पक्षाने जीटीएमध्ये आपले खाते उघडले आहे. आता आम्ही दार्जिलिंगच्या डोंगराळ भागाचा विकास करण्यासाठी इतरांना सहकार्य करू,” असे तमांग यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनित थापा यांना फोन करून त्यांच्या पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी ते पुढील आठवड्यात कोलकाता येथे जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gorkha regional administration election voters support new parties rater then established parties pkd
First published on: 30-06-2022 at 14:01 IST