आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्ष ताकदीने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. काल, शनिवारी (दि. ४ मार्च) आपची पहिली सभा दावणगेरे येथे संपन्न झाली. या सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, कर्नाटकच्या डबल इंजिन सरकारने केवळ भ्रष्टाचार डबल केला, पण विकास काही केला नाही. कर्नाटकला आता आपसारख्या अतिशय प्रामाणिक पक्षाचे मोनो इंजिन सरकार हवे आहे. या जाहीर सभेत आपचे पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. केजरीवाल यांनी सभेला संबोधित करत असताना, शून्य भ्रष्टाचार, मोफत वीज, सरकारी शाळांमधून जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा, ३ हजारांचा शिधा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि किमान आधारभूत किंमत देऊ, अशी आश्वासने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील यावेळी टीका केली. ते म्हणाले, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान म्हणाले होते की, कर्नाटक राज्यात २० टक्क्यांवाल्यांचे सरकार आहे. मला (भाजपाला) मतदान करा मी भ्रष्टाचाराचे उत्थान करेल. त्यांनी डबल इंजिन सरकारला मतदान करण्याचे आवाहन केले. केजरीवाल पुढे म्हणाले, “लोकांना वाटले मोदी खरे बोलत आहेत, त्यामुळे लोकांनी डबल इंजिन सरकारला निवडून दिले. पण डबल इंजिन सरकारने २० टक्के कमिशनला ४० टक्क्यांवर नेऊन भ्रष्टाचार डबल करुन दाखविला आहे.”

आप ‘मोनो इंजिन’ सरकार

“कर्नाटक राज्यात भ्रष्टाचार २० टक्क्यांहून ४० टक्क्यांवर गेला. यावेळी डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवू नका. नाहीतर कमिशन आणखी डबल होईल आणि ८० टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर ते कदाचित १०० टक्के देखील होऊ शकते. मी ज्या ज्या ठिकाणी जातो, तिथे लोकांना एकच गोष्ट सांगतो. डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवू नका. लोकांना डबल इंजिन नाही तर मोनो इंजिन सरकार हवे आहे आणि आम आदमी पार्टी हे ते नवीन इंजिन आहे”, अशा शब्दात केजरीवाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

केजरीवाल यांनी यावेळी भाजपा आमदारपुत्राच्या भ्रष्टाचार प्रकरणातील अटकेचाही संदर्भ दिला. ते म्हणाले, भाजपा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी समर्थ नाही. मागच्यावेळी अमित शहा कर्नाटकात आले होते. ते म्हणाले की, आम्ही भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडू. तेवढ्यात कुणीतरी त्यांना आठवण करुन दिली की राज्यात आपलीच सत्ता आहे. मागच्या पाच वर्षांपासून भाजपाची याठिकाणी सत्ता आहे. आता जर ते सांगत असतील की भ्रष्टाचाराचा खात्मा करु, मग मागच्या पाच वर्षांपासून ते काय करत होते? असा सवालही केजरीवाल यांनी विचारला.

अमित शाह हे कर्नाटकामधून जाताच भाजपा आमदाराच्या पुत्राला आठ कोटींसह अटक करण्यात आली. अजूनही आमदारांना अटक झालेली नाही. पण ते कदाचित त्यांना पुढच्यावर्षी पद्मभूषण पुरस्कार देतील, अशी उपहासात्मक टीका केजरीवाल यांनी केली. जे कुणी गुन्हेगार किंवा बेकायदेशीर काम करणारे लोक असतात, त्यांना भाजपामध्ये प्रवेश मिळतो, असेही ते म्हणाले.

सिसोदिया यांच्या अटकेबाबत बोलत असताना केजरीवाल म्हणाले की, सिसोदिया यांची अटक ही बेकायदेशीर आहे. कर्नाटकमध्ये आमदारपुत्राच्या घरी छापा टाकल्यानंतर आठ कोटी रुपये मिळाले. मनीष सिसोदिया यांच्या घरी धाड टाकल्यानंतर सीबीआयला काहीच मिळाले नाही. ते सांगतात मनीष सिसोदियांनी १०० कोटी गिळले, कधी ते ही रक्कम हजार कोटी असल्याचे सांगतात. त्यांच्या घरात काहीतरी सापडले पाहीजे ना. पण संपूर्ण छाप्यात फक्त १० हजार रुपये सापडले आणि त्यांच्या बँक खात्यातही काहीही नव्हते, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

जर कर्नाटकात आम आदमी पक्षाची सत्ता आली तर आम्ही राज्याला एक प्रामाणिक सरकार देऊ आणि कर्नाटकाला देशातले क्रमांक एकचे राज्य बनवू, अशीही घोषणा केजरीवाल यांनी केली. ते पुढे म्हणाले, “पंजाबमधील आमच्या एक मंत्री भ्रष्टाचार प्रकरणात आढळला, त्यावर मुख्यमंत्री मान यांनी त्यांना तात्काळ तुरुंगात पाठवले. तसेच काही दिवसांपूर्वी एक आमदार गैरव्यवहार प्रकरणी दोषी आढळला त्याचीही रवानगी तुरुंगात करण्यात आली. आम्ही कोणत्याही पक्षासोबत भेदभाव करत नाहीत. आम्ही केवळ काँग्रेस आणि अकाली दलाच्या नेत्यांना अटक करत नाहीत. जे भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले आहेत, त्यांनाच आम्ही अटक करतो. जर उद्या माझा मुलगा देखील भ्रष्टाचार प्रकरणात अडकला तर त्यालाही मी अटक करण्यास मागेपुढे पाहणार नाही.”

कर्नाटकामधील भ्रष्टाचारावर हल्लाबोल करत असताना केजरीवाल म्हणाले की, राज्यात सर्व काही विकत मिळत आहे. जर तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक बनायचे असेल तर ५५ लाख रुपये द्यावे लागतील. २५ लाख रुपये देऊन तुम्ही शिक्षक होऊ शकता. जर ५५ लाख रुपये देऊन कुणी पोलीस दलात येत असेल तर तो भ्रष्टाचारच करणार ना. जर २५ लाख रुपये देऊन कुणी शिक्षक बनत असेल तर तुमच्या मुलांना कशाप्रकारचे शिक्षण मिळेल. तसेच आमदार देखील विकले जातात. त्यांचे स्वतःचे आमदार सांगतात की, जर अडीच हजार कोटी असतील तर ते मुख्यमंत्री बनू शकतात. हे काय चालू आहे कर्नाटकात? त्यामुळे या पक्षाला उखडून फेका.

कर्नाटकातील कंत्राटदार दहशतीखाली वावरत आहेत. सरकारी अधिकारी आणि सरकारची त्यांना भीती वाटते. कंत्राटदार एकत्र येत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून ४० टक्के कमिशन मागितले जात असल्याची तक्रार केली आहे. मागच्या दोन वर्षांपासून ते पत्र लिहित आहेत. कंत्राटदार म्हणतात, अशा भीतीदायक वातावरणात आम्ही काम कसे करायचे? मात्र मोदीजींकडून याबाबत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नाही की, त्यांच्या पत्राला उत्तर दिले नाही. मागच्या पाच वर्षांत कर्नाटकमध्ये रस्ते दुरुस्तीसाठी २० हजार कोटी खर्च करण्यात आले. पण २० रस्तेही दुरुस्त झाले नाहीत. जवळपास १०० लोकांचा खड्ड्यांमुळे जीव गेला आहे. कुठे गेले ते २० हजार कोटी? असा प्रश्न उपस्थित करत केजरीवाल यांनी आपल्या पहिल्याच सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In his first karnataka poll rally arvind kejriwal targets bjp on corruption kvg
First published on: 05-03-2023 at 10:42 IST