उत्तर प्रदेशात गुरुवारी लोकसभेच्या दोन महत्वाच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत रामपूर या मतदार संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपाने संपूर्ण ताकद लावली आहे. रामपूर हा जेष्ठ समाजवादी नेते आझम खान यांचा बालेकिल्ला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामपूरमधून आझम खान हे विजयी झाले होते. त्यामुळे त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघातील सर्व राजकीय समीकरणांचा अभ्यास करून सत्ताधारी भाजपाने संपूर्ण ताकद लावली आहे. पक्षाने या निवडणुकीची जबादारी सुमारे १६ राज्यमंत्र्यांवर दिली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन सभांना संबोधित केले. रामपूरला भेट देणाऱ्या जेष्ठ मंत्र्यांमध्ये अर्थमंत्री सुरेश खन्ना यांचा समावेश आहे, ज्यांनी आतापर्यंत स्थानिक व्यापारी संघटना, चार्टड अकाउंटंट आणि बार असोसिएशनच्या वकिलांची भेट घेतली. समाजकल्याण, अनुसूचित जाती आणि आदिवासी कल्याण मंत्री असीम अरुण यांनी विविध भागातील जाट व समाजातील लोकांच्या सभांना संबोधित केले. दलितांपर्यंत पोचण्यासाठी भाजपाने माध्यमिक शिक्षण मंत्री गुलाब देवी आणि महसूल राज्यमंत्री अनुप प्रधान यांनाही तैनात केले आहे. इतर मागासवर्गीय म्हणून वर्गीकृत केलेल्या लोध समाजातील मतदारांना एकत्र आणण्यासाठी भाजपाने प्राथमीक शिक्षणमंत्री संदीप सिंग, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी एल वर्मा आणि उत्तर प्रदेशचे पाटबांधारे मंत्री धरमपाल यांना मतदार संघात2 पाठवले. सार्वजनिक बांधकाम मंत्री जिनित प्रसाद यांनी ब्राह्मणांच्या सभांना संबोधित केले.

दरम्यान, आझमगडमध्ये पक्षाच्या निवडणुकीच्या प्रक्रीयेवर लक्ष ठेवून असलेले राज्यमंत्री गिरीश चंद्र यादव म्हणाले की “आम्ही रामपूरवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत कारण आझमगडच्या तुलनेत ही जागा निवडून येणे अधिक सोपे आहे”. भाजपाच्या एका जेष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की ” भाजपाने यापूर्वी ही जागा जिंकली होती. हा मतदार संघ मुस्लिम बहूल मतदार संघ आहे. हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्ही जातीय समीकरणानुसार मंत्री आणि नेत्यांची नियुक्ती केली आहे. बसपा ही निवडणूक लढवत नसल्यामुळे आम्ही दलित मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाच्या एक नेत्याने सांगितले की,आझमगडमध्ये भाजपाची लढाई समाजवादी पक्ष, बसपा आणि मुस्लिम मतदारांमध्ये आहे. तेथील मुस्लिम मते ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.