चंद्रशेखर बोबडे

राज्यातून राज्यसभेवर पाठवायच्या सहा जागांसाठी निवडणूक होणारच हे निश्चित झाल्यावर आता यात महत्त्वाची भूमिका बजावणा-याअपक्ष आमदारांचा कल सत्ताधारी महाविकास आघाडीकडे की विरोधीपक्ष भाजपकडे असणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विदर्भात छोटेपक्ष व अपक्ष मिळून सहा आमदार आहेत. यापैकी काही भाजपसोबत तर काही सेनेसोबत आहे. मात्र ते राज्यसभेच्या निवडणुकीत या दोन पक्षांपैकी कोणाला मतदान करतील हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.अपक्ष आमदारांमध्ये आशीष जयस्वाल (रामटेक,जि- नागपूर), रमेश भोंडेकर ( भंडारा), देवेंद्र भुयार ( मोर्शी), विनोद अग्रवाल ( गोंदिया), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), आणि रवी राणा ( बडनेरा) यांचा समावेश आहे. यापैकी आशीष जयस्वाल, रमेश भोंडेकर हे मूळचे शिवसेनेचे आहेत व त्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे.

विनोद अग्रवाल हे मूळचे भाजपचे असून २०१९ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढले व जिंकले होते.सध्या ते भाजपसोबत असून फडणवीस समर्थक आहेत. रवी राणांची भाजपशी वाढलेली जवळीक सर्व परिचित आहे. किशोर जोरगेवार यांचा कल पूर्वी भाजपकडे होता.परंतु आता स्थानिक राजकारणात त्यांचे भाजपशी खटके उडाल्याने ते सध्या कोणाकडे आहे हे सांगणे कठीण आहे. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडून आले. पण राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याने अलीकडेच त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. भुयार सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत.

आशीष जयस्वाल हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असले तरी ते निधी वाटपावरून महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे. त्यांची नाराजी कांग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर अधिक आहे. विशेष म्हणजे त्यांचे फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध आहे. तांत्रिकदृष्ट्या त्यांनी मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नसल्याने त्यांचे मत कोणाच्या पारड्यात जाणार यावरून नागपुरात तर्कवितर्क सुरू आहेत. याशिवाय बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे दोन आमदार आहेत. खुद्द कडू राज्यमंत्री असून त्यांना सेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे ती दोन मते शिवसेना उमेदवारालाच मिळणार हे गृहीत धरले जात आहे.