बिहारमधील जनता दल (युनायटेड) पक्षाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांतर्गत ज्येष्ठ समाजवादी नेते मंगनीलाल मंडल यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर के सी त्यागी यांच्या जागेवर आमदार रजिब रंजन यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रजिब रंजन यांनी जानेवारी महिन्यात भाजपाला सोडचिठ्ठी देत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा >>> राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, शासकीय रुग्णालयांत आता मोफत उपचार, महत्त्वाचे विधेयक मंजूर!
नितीश कुमार यांचा ईबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
मंगनीलाल मंडल हे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या जवळचे सहकारी होते. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१८ साली जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. किशोर यांचा उचित सन्मान राखला जावा म्हणून जेडीयूने राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदाची निर्मिती केली होती. किशोर यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे या पदावर आता मंडल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडल यांना पक्षात महत्त्वाचे पद देऊन बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार ईबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा >>> कृषीमंत्र्यांच्या अंधारातील धावत्या दौऱ्याने शेतकरी नाराज
अनेक आमदार, खासदारांची सरचिटणीसपदी नियुक्ती
जेडीयू पक्षात ३२ राष्ट्रीय पदाधिकारी तर २२ राष्ट्रीय सरचिटणीसांचा समावेश आहे. रजिब रंजन हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. त्यांचीदेखील सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासह काही आमदार आणि खासदारांचीही सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
हेही वाचा >>> Jammu Kashmir Election : ‘…तर विधानसभा निवडणूक घेतली असती,’ ओमर अब्दुल्लांची भाजपावर टीका
पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार- के सी त्यागी
दरम्यान, के सी त्यांगी यांचे राष्ट्रीय प्रवक्तेपद काढून घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र पक्षाच्या या निर्णयावर खुद्द त्यागी यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. “मी नितीश कुमार यांची भेट घेऊन मला पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती. पक्षाच्या चरण सिंह, राज नरेन, चंद्रशेखर, व्ही पी सिंह, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, नितीश कुमार अशा नेत्यांचा प्रवक्ता होण्याचे मला भाग्य लाभले. माझ्याकडे सध्या कोणतीही जबाबदारी नसली तरी मी एक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी आता प्रयत्न करायचे आहेत. हे एक प्रमुख काम आहे,” असे के सी त्यागी म्हणाले.