जम्मू काश्मीरच्या बडगाव येथे ११ मे रोजी राहुल भट यांची अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्येमुळे स्थलांतरित काश्मिरी पंडितांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भट यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी मीनाक्षी यांना सुरक्षा दलाकडून दोन दिवसांनी त्या दहशतवाद्यांना पकडण्याचे आश्वासन दिले होते. सुरक्षा दलाने बांदीपोरा येथे शुक्रवारी संध्याकाळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी

राहुल भट हे स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी असलेल्या पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत काम करत होते. या योजनेअंतर्गत स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी असलेल्या एकूण ६००० पदांपैकी ५९२८ पदे भरलेली आहेत. उरलेली ७२ पदे ही खटल्यात अडकली आहेत. त्यापैकी १,०३७ लोकांना सुरक्षित भागात तयार करण्यात आलेल्या निवास व्यवस्थेत घर मिळालेले नाही. त्यामुळे या लोकांना सुरक्षित भागाच्या बाहेर रहावे लागते आहे. असुरक्षित भागांत राहणारे हे १,०३७ स्थलांतरित काश्मिरी पंडित जीव मुठीत धरून रोज प्रवास करत आहेत. भट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोऱ्यात त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर निदर्शने करत आहेत. भट हे सुरक्षित असणाऱ्या बडगाम येथील वसाहतीत राहत होते. परंतु काही अंतरावर असणाऱ्या त्यांच्या कार्यलयात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

पंतप्रधान रोजगार योजना 

राहुल भट यांच्यासारख्या स्थलांतरित पंडितांना परत सुरक्षित ठिकाणी आणणे आणि त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करणे यासाठी २००८ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान रोजगार योजनेची घोषणा करून ३००० पदे भरणार असल्याचे सांगितले. नंतर यामध्ये अधिकची ३००० पदे भरण्यात आली. हे पॅकेज म्हणजे २००२-०४ साली बनवण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसन योजनेचा भाग होता. ३७० कलम रद्द करणाऱ्या मोदी सरकारने याबाबत कुठलीही नवीन योजना आणली नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना खोऱ्यात परत येऊ इच्छिणाऱ्या पंडितांच्या कुटुंबाला घर बांधणीसाठी प्रत्येकी ७,५०,००० रुपये देण्याची योजना होती. मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही योजना यशस्वी झाली नाही. 

काश्मीर पंडितांची भूमिका काय आहे ?

भट यांच्या हत्येनंतर आंदोलन करणाऱ्या काश्मिरी पंडितांची महत्त्वाची मागणी आहे की त्यांना कमी वेतनावर इतक्या लांब जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्यामुळे ज्याप्रमाणे इतर सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळते त्याप्रमाणेच पंडितांना वेतन देण्यात यावे. काश्मिरी पंडित काश्मीर खोऱ्यातच काम करतील अशी कामे त्यांना उपलब्ध करून द्यावीत. सरकार कमी पगार देऊन पंडितांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

भट यांच्या हत्येनंतर राजकीय आरोपांच्या फैरी

राहुल भट यांच्या हत्येचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह सर्वच राज्यात भाजपा विरोधी पक्षांनी हत्येसाठी मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. त्यातच राहुल भट यांच्या कुटुंबाने काश्मिरी पंडितांना ‘बळीचा बकरा’ बनवल्याचा आरोप करत नव्या राजकीय वादाला खतपाणी घातले आहे.