दयानंद लिपारे
कोल्हापूर : सलग पाच निवडणुकातील पराभवआणि महत्त्वाच्या संस्थांतील राजकीय अस्तित्वाला हादरा यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या महाडिक गटाचे अस्तित्व राजकीय दृष्ट्या क्षीण झाले होते. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या यशाने रातोरात महाडिक गटाला उभारी मिळाली आहे. खासदारकी परत मिळाल्याने धनंजय महाडिक यांचे महत्त्व वाढीस लागले असून कोल्हापूर जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रभाव वाढीस लागला आहे. यापुढे कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा तुल्यबळ सामना पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रबळ राजकीय गट म्हणून महाडिक गटाची ओळख होती. अगदी चार-पाच वर्षापूर्वी या कुटुंबात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी राजकीय महत्वाची पदे आणि गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेवर वर्चस्व होते. नंतरच्या काळात त्यास उतरती कळा लागली.
धनंजय महाडिक यांनी संसदेत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. त्यात काही वेळा यश आले तर अनेकदा यशाने हुलकावणी दिली. पहिल्याच निवडणुकीत ते सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले. पुढच्या निवडणुकीत त्यांनी लोकसभे ऐवजी विधानसभेचा मार्ग धरला. याही निवडणुकीत ते सतेज पाटील यांच्याकडून पराभूत झाले. नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मोदी लाटेतही ते संसदेत पोहोचू शकले. खासदार म्हणून त्यांची कामगिरीही प्रभावी झाली. विकासकामांवरही भर होता. लोकसंपर्क चांगला होता. दोन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला होता. मात्र जिल्ह्यातील नेत्यांशी त्यांचे बिनसले. मागील लोकसभा निवडणुकीवेळी सतेज पाटील यांनी ‘ आमचं ठरलंय ‘ हे घोषवाक्य घेऊन शिवसेनेचे संजय मंडलिक यांना पाठबळ देऊन निवडून आणले. तेव्हा महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर वर्षभराने महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन वर्षाच्या अंतरानंतर आता ते राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संसदेत पोहोचले आहेत.

महाडिक गटाला उभारी
ताज्या विजयामुळे धनंजय महाडिक यांच्यासह महाडिक गटालाही उभारी मिळाली आहे. महाडिक गटाचा जिल्ह्यातील राजकीय आणि संस्थात्मक गटावर प्रभाव होता. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, विधानसभा निवडणुकीत अमल महादेवराव महाडिक हे पराभूत झाले. शौमिका अमल महाडिक यांची मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेले. विधानपरिषद निवडणुकीत महाडिक यांनी सतेज पाटील यांना आव्हान देण्याचे ठरवले होते. पण ही निवडणूक बिनविरोध झाली. अलीकडे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांचा पराभव झाल्याने महाडिक गटाची पीछेहाट झाली तर सतेज पाटील यांची सरशी झाली. अशातच गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक येथे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दुकलीने प्रभाव निर्माण केला. परिणामी महाडिक गटाला नमते घ्यावे लागले होते. मात्र आता धनंजय महाडिक यांच्या विजयामुळे महाडिक गटाची ताकद वाढली आहे. भाजपलाही बळ मिळाले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन्ही जागांवर पराभव झाला होता. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपला पराभवास सामोरे जावे लागले होते. यामुळे चंद्रकांतदादा टीकेचे धनी बनले होते. आता राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे चंद्रकांतदादा पाटील यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय प्रभाव वाढीस लागणार आहे. यातून ते लोकसभा, विधानसभा या निवडणुकीची पायाभरणी सुरू करतील. तसेच, कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक येथेही कमळ फुलवण्यासाठी दादांची व्यूहरचना दिसत आहे. आगामी काळात महा विकास आघाडी विरुद्ध भाजप असा तोडीस तोड राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरण धगधगते राहणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेची जबरदस्त पीछेहाट झाली. त्यांचे सहा पैकी पाच आमदार पराभूत झाले. राज्यसभा निवडणुकीत संजय पवार विजय झाले असते तर शिवसेनेला बळ मिळेल अशी अपेक्षा होती. पवार हे पराभूत झाल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थात शिवसेनेला आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसत आहे.