रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे पुर्ण ताकदीने लढणार आहे. या दृष्टीने पक्षाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्याच्या उत्तर विभागात पक्षाची बऱ्यापैकी ताकद असून, या भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मनसेची कामगिरी महत्वपूर्ण मानली जात आहे. खेड नगर पालिकेवर माजी जिल्हाध्यक्ष व राज्य सरचिटणीस असलेल्या वैभव खेडेकर यांनी मनसेची सत्ता आणून नगराध्यक्षपद भूषविले होते. याभागात मनसेने आपले ब-यापेकी वर्चस्व प्रस्थापित केले होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर विभागात मनसेवर विश्वास ठेवणारी मोठ्या प्रमाणावर जनता असल्याने या भागात पुन्हा मनसेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार उभे करुन मनसेने आपली ताकद दाखवून दिली आहे. याच पार्श्वभूमीवर येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे पुर्ण ताकदीनिशी उतारणार आहे.

जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसे उत्तर रत्नागिरीत पुन्हा एकदा नव्या जोमाने उतरत असून यासाठी मनसेचा भव्यदिव्य मेळावा चिपळूण येथे १८ मे रोजी बड्या नेत्यांच्या उपस्थित होणार आहे. या मेळाव्यातून आगामी लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या मेळाव्या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे होणारा हा मनसेचा मेळावा रत्नागिरीतील राजकीय क्षेत्राला वेगळी कलाटणी देणारा ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्या समोर ठेवून मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

मनसने उत्तर रत्नागिरी विभागामध्ये पक्ष बांधणीचे काम जोरदार सुरू केले आहे. जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी वरीष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पाच तालुक्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली आहे. राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी उत्तर रत्नागिरीतील मनसेला मजबूत स्थितीत उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश होणार असल्याने मनसेमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.