scorecardresearch

महाराष्ट्रात निघणाऱ्या हिंदू आक्रोश मोर्चावर मुस्लीम विचारवंतांचा आक्षेप; मोहन भागवतांना पत्र लिहून म्हणाले…

Muslim Intellectuals upset with RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मुस्लीम विचारवंतानी २३ मार्च रोजी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

Mohan Bhagwat on Pandit remarks
राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

Muslim intellectuals write Letter to RSS: मुस्लीम समाजातील काही विचारवंत मागच्या वर्षीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळ आले आहेत. या विचारवंतांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र लिहून द्वेषपूर्ण भाषण आणि मुस्लीम समाजाच्या विरोधात होणाऱ्या बैठकांवर नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्रात निघत असलेल्या लव्ह जिहाद मोर्चांचाही उल्लेख केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या घटनांमध्ये हस्तक्षेप करावा आणि मुस्लीमविरोधी कारवायांना प्रतिबंध करावा, अशी मागणी या विचारवंतांनी केली आहे.

दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी, राज्यसभेचे माजी खासदार शाहीद सिद्दीकी, निवृत्त लेफ्टनंट जनरल यू. शाह आणि सईद शेरवानी यांची स्वाक्षरी असलेले हे पत्र २३ मार्च रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पाठविण्यात आले आहे. हे लोक AEEDU (Alliance for Economic and Educational Empowerment of the Underprivileged) या संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत. संघ आणि मुस्लीम समाजात संवादाचा दुवा राखण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजांत असणारी दरी कमी करून महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या मंचाचा वापर करण्यात येतो.

हे वाचा >> धर्मांतर केलेल्या दलित ख्रिश्चन, दलित मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ द्यावा का? संघ परिवार करणार चिंतन

“महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुस्लीम समाजाच्या विरोधात मोर्चे निघत आहेत. ज्यामध्ये मुस्लीम समाजाच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषा वापरण्यात आली आणि मुस्लीम समाजाच्या व्यवसायांवर बहिष्कार घालण्याची भाषा वापरण्यात आली. महाराष्ट्रात निघालेल्या मोर्चांची राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी दखल घेतली. या मोर्चांना पोलिसांचे सरंक्षण देण्यात आले होते. मोर्चामध्ये द्वेषाची भाषा वापरण्यात आली असून मुस्लीम समाजाच्या विरोधात हिंसाचारास चिथावणी देण्यात आली,” असा तक्रारीचा सूर संघाला लिहिलेल्या पत्रात उमटला होता.

AEEDU ने पुढे सांगतिले की, मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संघासोबत झालेल्या बैठकीनंतर पुढे फार काही सकारात्मक घडलेले नाही. तरीही आम्ही आरएसएसचे पदाधिकारी कृष्णा गोपाल यांच्या माध्यमातून संघाशी संवाद सुरूच ठेवू. तसेच मोहन भागवत यांच्यासोबत आणखी एक बैठक आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. मात्र पुढील काही महिने डॉ. मोहन भागवत उपलब्ध नसल्याचे उत्तर आरएसएस मुख्यालयातून मिळाले आहे.

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तसेच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत मोहन भागवत आणि AEEDU यांच्यात बैठक झाली होती. जमात उलमा-ए-हिंदने या बैठकीसाठी आपले प्रतिनिधी पाठवले होते. इतर मुस्लीम नेत्यांनाही या संवादाच्या प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न AEEDU कडून सुरू आहे.

हे ही वाचा >> इस्लाम धर्मातील कट्टर विचारसरणीचा देशाला धोका- स्वयंसेवक संघ

‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलत असताना राज्यसभेचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी म्हणाले की, मुस्लीम उलेमा आणि समाजातील विचारवंत आणि व्यावसायिकांकडून आमच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. काफीर किंवा जिहादी आणि गाईंच्या कत्तलीबाबत संघाकडून जी काळजी व्यक्त करण्यात आली, त्याबाबत संघाचा आणि आमचा एकच विचार आहे. तथापि, अल्पसंख्याक समाजावर होणारे हल्ले आणि द्वेषयुक्त विधानांबाबत आम्ही चिंता व्यक्त केली. संघ परिवाराकडून आमच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती. मात्र यापुढे दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचा विचार मागच्या बैठकीत करण्यात आलेला आहे.

काय लिहिले आहे या पत्रात?

हे पत्र लिहिणाऱ्या AEEDU सदस्याने सरसंघचालक यांना आवाहन केले की, संघाच्या राष्ट्रबांधणीच्या कामाबाबत कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. जर सर्व समाजांना एकत्र घेतले नाही, तर राष्ट्रबांधणी होऊ शकणार नाही. यामध्ये देशातील २० टक्के अल्पसंख्याकांना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रनिर्मिती कशी होणार? यामुळे संघाकडून किंवा संघाशी निगडित संघटनांकडून जर चिथावणीखोर वक्तव्ये होत असतील तर त्याला संघाने विरोध केला पाहीजे. प्रेम आणि सद्भावना वाढीस लागेल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. तुम्ही याबद्दल अनेकदा आवाहन केलेले आहे. जे सामाजिक सद्भावनेला तडा जाईल असे वक्तव्य करत असतील त्यांना समज देण्याचे काम संघाचे सरसंघचालक म्हणून आपण किंवा राज्य सरकारांनी करावे.

आणखी वाचा >> केरळमध्ये संघाचा ख्रिश्चनांशी संवाद, तर मुस्लिमांशीही चर्चा करण्यास तयार

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वाची बैठक हरियाणा येथे संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम समाजाकडून वापरल्या जाणाऱ्या काफीर आणि जिहाद शब्दांना आक्षेप घेतला. यानंतर उलेमांनी यावर उत्तर देताना सांगितले की, अशा भाषेला भारतात जागा नाही आणि असे शब्द वापरण्याची आम्हाला आवश्यकतादेखील नाही.

यापुढील बैठक दिल्लीच्या बाहेर देशाच्या इतर भागात होईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 17:55 IST

संबंधित बातम्या