दयानंद लिपारे

एक नेता. दुसरा अभिनेता. अभिनेत्याने मंत्री असलेल्या नेत्याला एकेरी उल्लेख करत दिलखुलास संवाद रंगवला. हे पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या गेल्या. दोघांमधील मैत्रीपूर्ण प्रसंग कोल्हापुरात घडला.

त्याचे असे झाले. कागल येथे चार महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते आयोजित केले होते. याचे संयोजक ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. कार्यक्रमासाठी आलेल्या पाटेकर यांचा मुक्काम येथील एका हॉटेलवर होता. मुश्रीफ तेथे नानांचे स्वागत करण्यासाठी गेले. मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच नाना खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांना अलिंगन दिले. इतकेच नाही तर मैत्रीच्या पातळीवर संवाद रंगवला.

तू इकडे कशाला आलास?

नाना पाटेकर म्हणाले, अरे तु इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो. उत्तरादाखल मुश्रीफ म्हणाले, असे कसे? पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य करणं हे आम्हां कोल्हापूकरांचे संस्कार आहेत. पुढे दोघांत दिलखुलास गप्पा रंगल्या.

पंकजा मुंडे विधानपरिषदेसाठी परळी विधानसभेचा दावा सोडणार?

मैत्रीसाठी नानांचा ‘दे धक्का’

यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा नानांनी केलेला एकेरी उल्लेख ऐकून सोबत असलेले व्ही. बी. पाटील, राजेश लाटकर आदी उपस्थित अवाक् झाले. तत्परतेने नाना म्हणाले, हसन माझा जवळचा दोस्त आहे रे. उगाच गैरसमज करून घेऊ नका. त्यावर नानांनी एक मासलेवाईक किस्सा ऐकवला. काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्याने जात असलेला हसन मला दिसला. मी ‘ ‘हसन…हसन’ असे हाक मारत निघालो. या घाईत हसन काही थांबले नाही मात्र माझी गाडी दुसऱ्याला धडकली.’ त्यावर उपस्थितांत हास्य पसरले. या नंतर उपस्थितांमध्ये नाना पाटेकर यांनी राजकीय नेत्यांसोबत देखील राखलेल्या या मैत्रीचे अनेक किस्से मग चर्चेला येत राहिले.