अमरावती : राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यभरात मंगल कलश यात्रा काढण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी ते सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकापर्यंत निघालेल्या या यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत असला, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने रणशिंग फुंकल्याचे चित्र दिसून आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या दिना निमित्त राज्यभर ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रा’ काढण्यात आली आहे. अमरावती विभागात निघालेल्या या मंगल कलश यात्रेचे मंगळवारी अमरावती येथे आगमन झाले. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते मंगल कलश यात्रेचे पूजन झाले.

अमरावती विभागातील यात्रा मोझरी येथून सुरु झाली. तिथे पूजन करून जिल्ह्यातील गाविलगड किल्ला चिखलदरा, जैन तीर्थस्थळ मुक्तागिरी, संत श्री गुलाबराव महाराज कर्मभूमी माधान, महानुभाव पंथाची काशी श्री क्षेत्र रिद्धपूर, गाडगे बाबांचे निर्वाणस्थान वलगाव, विदर्भ कन्या रुक्मिणी देवीचे माहेर कौंडण्यपूर इत्यादी ठिकाणांहून एकत्रित केलेले पवित्र माती व नदीचे पाणी कलशामध्ये विसर्जित करण्यात आले.

कलश यात्रेच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा गौरव व संस्कृतीचा वसा जोपासत समृद्ध महाराष्ट्राचा अमृत कलश पुढे नेऊ, असा निर्धार राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या इतिहासाचे जतन, सभ्यता संस्कृती व परंपरेचे दर्शन तसेच गड-किल्ले संवर्धन व थोर महापुरुषांच्या कार्याचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने मंगल कलश यात्रा राज्यभर काढण्यात येत आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, पुरोगामी विचार, सामाजिक दायित्वाची भावना व समृद्ध विकास आदी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले.

या कलश यात्रेच्या निमित्ताने पक्ष संघटनेला मजबूत करण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार की तीनही पक्ष स्वबळावर लढणार, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचेही मत जाणून घेतले जात आहे. राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांमधून पुढे आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही हीच भावना व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आमदार निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटापेक्षा राष्ट्रवादीची कामगिरी सरस आहे. यवतमाळ, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील या आमदारांच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्याचा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि विभागीय समन्वयक संजय खोडके यांना विधान परिषद सदस्यत्व देऊन पक्षाने त्यांना पश्चिम विदर्भात मोठी जबाबदारी दिली आहे. संजय खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटचे मानले जातात. महापालिका निवडणुकीच्या वेळी त्यांच्या गटाची परीक्षा आहे. आता राज्य पातळीवर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.