विश्वास पवार

वाई: सातारा जिल्ह्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारणच नेहमी चर्चेत असते. नुकतीच झालेली किसन वीर साखर कारखाना निवडणूक आणि एका राजकीय कार्यक्रमातून हे जिल्ह्यातील गटबाजीचे राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले आहे. यातून कधीकाळी जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार शशिकांत शिंदे आणि भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु २०१९ च्या राज्यातील घाऊक राजकीय स्थलांतरामध्ये या जिल्ह्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, अतुल भोसले, मदन भोसले आदींनी पक्षांतर करत भाजपामध्ये प्रवेश केला. सातारा जिल्ह्यात अस्तित्व शोधत असलेला भाजप या पक्षांतरानंतर राष्ट्रवादीचा प्रबळ विरोधक ठरला. मात्र साताऱ्याचे राजकारण हे कायम पक्षापेक्षाही गटबाजीभोवती फिरत असल्याने त्याचा प्रत्यय २०१९ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत आला. याचेच दर्शन पुन्हा एकदा किसन वीर साखर कारखाना निवडणूक आणि एका राजकीय कार्यक्रमातून दिसून आले. 

किसन वीर साखर कारखान्यावर पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी आणि सध्या भाजपामध्ये दाखल झालेल्या मदन भोसले यांची सलग १९ वर्षे सत्ता होती. त्यांच्या या काळातच कारखान्याने विस्तार, साखर उद्योगातील विविध प्रयोग, उपपदार्थ निर्मिती, अन्य कारखाने चालवण्यास घेणे आदींतून मोठी भरारी घेतली. परंतु याच वाढत्या पसाऱ्याने कारखान्याची आर्थिक स्थिती ढासळत गेली. दुसरीकडे राज्यात घडलेल्या सत्ताबदलांनंतर कारखान्याची आर्थिक कोंडीही झाली. अखेर भोसले यांना या निवडणुकीत सत्ता गमवावी लागली. वाई-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने कारखान्याची सत्ता ताब्यात घेतली. परंतु निवडणुकीच्या या दृश्य रूपामागे अंतर्गत घडलेल्या हालचाली मोठ्या मजेशीर आहेत. ही निवडणूक वरवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी दिसत असली तरी प्रत्यक्षात पडद्यामागे घडलेल्या हालचाली मात्र राजकीय गट-तट विचारात घेत झालेल्या आहेत.

या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील वाई, सातारा, खंडाळा, जावळी, कोरेगाव, महाबळेश्वर या सहा तालुक्यांत पसरलेले आहे. यामुळे या तालुुक्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका देखील या निवडणुकीत महत्त्वाची होती. गेल्या काही दिवसांमध्ये याच भागात राजकीय कार्यक्षेत्र असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे या लोकप्रतिनिधींनी देखील उघड किंवा छुप्या पद्धतीने निवडणुकीत सहभाग घेतला. यात शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांना मदत करत भविष्यातील त्यांच्यासोबतची लढाई संपुष्टात आणली. दुसरीकडे या मदतीमधून गेले काही दिवस सुरू असलेला आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध साताऱ्यातील राजे गट यांच्यातील संघर्षाला आमदार मकरंद पाटील यांच्याकडून मिळू पाहात असलेले बळ शांत करण्यातही ते एकप्रकारे यशस्वी झाले. निकालानंतर मकरंद पाटील यांनी सर्वप्रथम भाजपच्या गोटात असलेल्या या दोन्ही राजांच्या मानलेल्या आभारातूनच या ‘बेरजेच्या राजकारणा’ची पावले उघड होतात.

जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे विरुद्ध राजे गट हा संघर्ष जुना आहे. कधीकाळी जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेल्या शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. आपल्या राजकीय प्रवासात अडथळा ठरू शकणाऱ्या शिंदे यांच्याविरुद्ध पक्षाच्या पलीकडे जात अनेक गट-तट एकत्र आल्याचे ते पहिले दर्शन होते. यातच पुढे सहजशक्य असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही या विरोधी गटाने शिंदे यांचा धक्कादायक पराभव घडवून आणला. या सर्व घटनांमधून शिंदे विरुद्ध राजे गट त्यातही शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत होता. परंतु या सलग दोन पराभवांनंतरही न खचता शिंदे यांनी त्यांच्या मूळ जावळी आणि कोरेगाव तालुक्यातील गटबांधणी सुरू ठेवलेली होती. या साऱ्यात राज्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेचा दाखला ते सातत्याने देत होते. यातूनच जे भाजपमध्ये गेले ते आता सत्ता नसल्यामुळे विकास करू शकणार नसल्याचा प्रचार सुरू झालेला होता. परंतु याही मुद्द्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मिळवत शिंदे यांना गप्प केले.

जावळी तालुक्यात घडलेल्या एका कार्यक्रमातून या संघर्षाचा नवा अंक नुकताच बाहेर आला. या वेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला. या वेळी ते म्हणाले, ‘मी भाजपचा आमदार असल्यामुळे आता मतदार संघाचा विकास होणार नाही, असा अपप्रचार करणाऱ्यांना प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच २५ कोटी रुपयांचा निधी देत चांगली चपराक लगावली आहे. मी भाजपमध्ये असलो तरी अजितदादांचे सर्वाधिक सहकार्य मला असते. त्यामुळे माझ्याबद्दल अपप्रचार करत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेऊ पाहणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे!’ या आरोपानंतर केवळ शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वादाचा पुढचा अंक तयार झाला नाही, तर अजितदादांच्या या सहकार्यामागे ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीनंतर आमदार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिंदेच्या धडपडीचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली . एकंदरीत साताऱ्यातील कागदावरील पक्षीय बलाबल काहीही असले तरी इथल्या राजकारणाची पावले मात्र गटातटांच्या बांधणीवर सुरू असतात, हे पुन्हा स्पष्ट झाले.