अभिजीत ताम्हणे

आजच्या दलित तरुणांचे राजकारण साऱ्याच प्रस्थापित दलित पक्षांपेक्षा वेगळे असणार असा विश्वास दृढ करणारा आणि संघर्षाइतकेच अभ्यास, उच्चशिक्षण , संस्था उभारणी यांचे महत्त्व मान्य करून या वेगळ्या दिशेसाठी “सर्च इंजिन” ठरणारा दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम शनिवार व रविवारी येथे पार पडला . तरुणांना पँथर चळवळीचे मर्म सांगणारे हे दोन दिवस, पन्नाशीच्या त्या चळवळीलाही तरुण करणारे ठरले !

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

विद्नोहाची दिशा अर्धशतकापूर्वी दाखवणाऱ्या दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवाचे मोठे निमित्त या कार्यक्रमाला होते. या संघटनेचे एक संस्थापक ज. वि. पवार यांच्यासह अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ शी संबंधित असलेले हेन्री गॅडिस, मायकल मॅकार्टी आणि प्रा. जाकोबी विलियम्स यांचा सहभाग हे आकर्षण होते. “ ब्लू प्राइड कार्निव्हल” असे नाव दिलेल्या या उपक्रमात चार परिसंवाद तसेच दररोज एकेक नाटक, कविता वाचन आणि रॅपसंगीत असेही कार्यक्रम झाले.

उद्घाटनाच्या सत्रात, ‘ दलित पँथर ही संपलेली चळवळ आहे असे समजू नका, कारण चळवळ कधीच संपत नसते , ‘ असा पुकारा करतानाच; यापुढली चळवळ ही समृद्धीकडे जाऊनही शोषितांना न विसरणारी असेल, असे आवाहन दलित- आफ्रिकी चळवळींचे कृतीशील अभ्यासक सूरज एंगडे यांनी केले. पँथरचा विद्रोह मोडून काढताना व्यवस्थेने घातलेल्या घावांनी कार्यकर्त्यांची घरे बरबाद झाली तसे आता होऊ नये , अशा शब्दांत व्यवस्थेच्या आत जाऊनही संघर्ष करण्याचा पर्याय खुला असल्याकडे सूरज यांनी लक्ष वेधले. ‘चळवळीतच आपली लेकरेबाळे, आपला संसार असतो’ असे सूरज म्हणाले तेव्हा बहुसंख्य तरुण श्रोत्यांनी टाळ्यांची दाद दिली. यावर नापसंती व्यक्त न करता ज. वि. पवार म्हणाले की, पँथरांनी तर मरणसुद्धा स्वीकारण्याची तयारी ठेवली होती. एका त्रोटक निरोपावर तीन-तीन हजार स्त्रीपुरुष कार्यकर्ते जमायचे, रूढार्थाने अशिक्षित असूनही मूल्यनिष्ठा पक्की राखायचे , याची आठवण त्यांनी करून दिली. अमेरिकी वक्त्यांपैकी सर्वांत ज्येष्ठ हेन्री गॅडिस यांचा सूर त्या काळातील चळवळ कशी बहरली आणि आता व्यवस्थात्मक बदलांमुळे, आजची चळवळ त्याच पद्धतीने वाढण्याच्या वाटाच कशा बंद होत गेल्या, हे स्पष्ट केले. मायकल मॅकार्टी आणि प्रा. जाकोबी यांनी, आपला साऱ्यांचा लढा आपापल्या प्रांतातील शोषणाविरुद्ध आहेच पण आज या शोषणाला जी नववसाहतवादी व्यवस्था बळ पुरवते, तिच्याशीही तिचीच आयुधे वापरून लढावे लागेल, याचे भान दिले. जागतिक संपर्कजाळे विणण्यासाठी नांदेडमध्ये दरवर्षी दलित – शोषित चळवळींच्या अभ्यासकांचे एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र भरवण्याचा निर्धार सूरज एंगडे यांनी व्यक्त केला. नांदेडलाच या चळवळीचे अभिलेखागार ( आर्काइव्ह) उभारण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.

आजच्या दलित राजकारण्यांबद्दल चीड, हताशा ही भावना ज. वि. पवार, राहुल सोनपिंपळे अशा वक्त्यांनी आणि कवी- संवादक नितीन चंदनशिवे यांनीही व्यक्त केली. ‘जेएनयू’ चे माजी विद्यार्थी प्रतिनिधीमंडळ प्रमुख सोनपिंपळे यांनी ‘संघ परिवारा’ चे उदाहरण देऊन , संस्था- उभारणीखेरीज सामाजिक व राजकीय संघटन टिकत नसते, असा मुद्दा मांडला. मराठा, जाट किंवा पाटीदार जोवर शोषण करतात, तोवर ते ‘बहुजन’ कसे, असा सवालही त्यांनी केला ; पण कवी चंदनशिवे यांच्याकडून त्याला उत्तर मिळाले. आपली चळवळ मानवमुक्तीची आहे, मग विश्वासाने माणसे जोडत राहायलाच हवे, अशी मांडणी चंदनशिवे यांनी कविता आणि श्रोत्यांशी संवादातून केली. रॅप संगीतातून आजच्या जागतिक प्रश्नांबद्दलचे नव्या ‘ मोबाइल पिढी’ चे भान प्रकटले, त्यात ‘ स्वदेशी रॅप’ चमूने लावलेला ‘ अगर रहना है संग । तो बदलना होगा जीने का ढंग। ‘ हा सूर ‘पर्यावरण रक्षणासह मानवमुक्ती’ असा विचार मांडणारा ठरला .

इंदिरा आठवले यांचे सवाल

‘ पुन्हा पँथरच हवी असं नाही, पण तो निर्भीडपणा हवा आहे, ‘ असे दलित पँथरच्या अभ्यासक इंदिरा आठवले म्हणाल्या. ‘ समृद्धी तर हवी, पण तेवढ्याचसाठी आपण आपली सारी ताकद लावणार का? आज ताकद लावावी लागणार आहे ती अन्यायाविरुद्ध आणि स्वतःचे भाईबंद जर शोषकांची बाजू घेणार असतील त्यांच्याहीविरुद्ध ‘ हे त्यांचे आवाहन होते. ‘कौशल्यविकासावर शिक्षण-धोरणात भर , हेही बहुजनांविरुद्ध षडयंत्रच. आम्ही केवळ कुशल कामगारच बनावे ही अपेक्षा ‘बाबू पाहिजेत’ म्हणून इंग्रजी शिक्षण आणणाऱ्या ब्रिटिशांपेक्षा निराळी कशी काय ? ‘ असा सवाल त्यांनी केला. याच परिसंवादात पत्रकार / चित्रपटकार वैभव छाया यांनी , ‘ आपण किती काळ टीकात्मक राजकारण करत राहणार ? आता चळवळ करण्याचे मार्ग बदलूया- ‘फॅार्म ‘ बदलूया, ‘ असे आवाहन केले.

राज्यकर्ती जमात व्हाभीम आर्मी’ चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांची सभादेखील याच मंचावर झाली . शंकरराव चव्हाण सभागृहात झालेल्या या दोन दिवसांच्या उपक्रमाचे प्रमुख संयोजक राहुल एस. एम. प्रधान हे चंद्रशेखर आझाद यांनी स्थापलेल्या ‘ आजाद समाज पार्टी ‘ चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही असल्याने या सभेला महत्त्व होते. सभागाराच्या बाहेरही गर्दी ओसंडलेली होती. आझाद यांचे भाषण ‘राज्यकर्ती जमात व्हा’ या संदेशाचा पुनरुच्चार करणारे, परंतु भावनिक आवाहनासारखे ठरले .‘ एंगडे ते आझाद असा वैचारिक भूमिकांचा पटच या दोन दिवसांत दिसला,’ असे मत जळगांव येथील प्रा. दिलीप चव्हाण यांनी अनौपचारिकपणे व्यक्त केले. अर्थात, उपक्रम वैविध्यपूर्ण असावा, तो आजच्या तरुणांचा असावा आणि प्रस्थापित नसलेल्यांनाही त्यात स्थान असावे ही या एकंदर आयोजनामागील भूमिका असल्याचे दोन्ही दिवस दिसत राहिले!