Premium

Odisha Tragedy : ओडिशा रेल्वे अपघातानंतर विरोधकांकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

ओडिशाच्या बालासोरा जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वेच्या अपघातामध्ये मृतांची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे. या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली व्यक्त करत असतानाच आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Railway minister Ashwini Vaishnav
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. (Photo – ANI)

Odisha train accident latest news : ओडिशामध्ये शुक्रवारी रात्री (दि. २ जून) तीन रेल्वेची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामधील मृतांना सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात असतानाच आता विरोधकांकडून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रेल्वेच्या सदोष सिग्नल यंत्रणेमुळे एवढा मोठा अपघात झाला, असा आरोपही विरोधकांकडून होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जवळपास २८० लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक प्रवाशी जखमी आहेत. बालासोर जिल्र्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन भीषण रेल्वे अपघात झाला. १९९९ नंतरचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तृणमूल काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

तृणमूल काँग्रेस पक्षाने शुक्रवारीच अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची पहिल्यांदा मागणी केली. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला की, विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकार कोट्यवधींचे स्पाय सॉफ्टवेअर (हेरगिरी करणारे तंत्रज्ञान) विकत घेते. मात्र असे अपघात टाळण्यासाठी धडक प्रवण यंत्रणा किंवा कवच सारखी प्रणाली बसविली जात नाही. बॅनर्जी पुढे म्हणाले की, मोदी सरकार वंदे भारत सारख्या रेल्वे सुरू करणे आणि नवे रेल्वे स्थानक उभारून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. कारण सुरक्षेकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे गरीब आणि उपेक्षित वर्ग नेहमीच नाडला जातो. मग तो निर्णय जीएसटी, लॉकडाऊन, कृषी कायदे किंवा रेल्वे सुरक्षेसंबंधीचे निर्णय असोत.

या दुर्दैवी अपघातात ज्यांचा दुःखद मृत्यू झाला त्यांना मी अंतकरणापासून श्रद्धांजली वाहतो. जे जखमी आहेत, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये जराही विवेक जागा असेल तर त्यांनी तात्काळा राजीनामा द्यावा, अशी पोस्ट बॅनर्जी यांनी फेसबुकवर लिहिली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्या सूरात सूर मिळवत तृणमूलचे प्रवक्ते साकेत गोखले यांनीही अशीच प्रतक्रिया दिली आहे. “ज्या कुटुंबांची या अपघातामुळे हानी झाली, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे या तीन रेल्वे एकमेकांवर धडकल्या असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाली आहेत, ज्याची उत्तरे मिळायला हवीत.”, असे ट्विट गोखले यांनी केले आहे.

सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य हवे

ओडिशातील रेल्वे अपघात भयानक असून रेल्वे मार्गाचा विचार करता सुरक्षा व्यवस्थेला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले पाहीजे. या अपघातामुळे अनेक विधायक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे ट्विट काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी रात्री या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. तसेच बचाव कार्यात मदत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शक्य तितकी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनीही रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा अपघात दुर्लक्षामुळे झाला आहे. रेल्वेमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहीजे, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत म्हटले की, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे राबविण्यात येणारे सर्व कार्यक्रम काही दिवसांसाठी स्थगित करण्यात येत आहेत. मोदी सरकारला नऊ वर्ष झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 18:02 IST
Next Story
प्रिय, गोपीनाथराव मुंडे…