मधु कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जागावाटप जाहीर करुन टाकले. २८८ पैकी भाजप २४० जागा लढणार आणि शिंदे गटाला ४८ जागा सोडणार, हे सूत्र भाजप पदाधिकाऱयांच्या कार्यशाळेत बावनकुळे यांनी मांडले. साहजिकच त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. नंतर त्यांनी सारवासारवही केली. विरोधकांकडून मात्र जागावाटपाचा वा कुणी किती जागा लढवायच्या हा भाजप व शिंदे गटाचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात ज्यांनी धाडसी कामगिरी पार पाडली, त्या एकनाथ शिंदे यांना फारसे महत्त्व भाजप देत नाही हाच संदेश गेल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

भाजपचे मित्र पक्षांबरोबर असे कायमच वर्चस्ववादी राजकारण राहिले आहे, शिंदे गटही त्याचा अनुभव घेऊन, त्यातून या दोन पक्षात अंतर्गत बेवनाव होईल, त्याचा फायदा उठवण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करणार. बावनकुळे यांनी जे जागावाटपाचे सूत्र जाहीर केले आहे, त्यामुळे शिंदे गटात नाराजी निर्माण होणार आहे. शिंदे गटाकडे सध्या जेवढे आमदार तेवढ्या जागा त्यांना द्यायच्या असा भाजपचा विचार दिसतो आहे, याचा अर्थ भाजप ४८ मतदारसंघांव्यतिरिक्त शिंदे गट अस्तित्वात आहे, हे त्यांना मान्य नसावे, अशी प्रतिक्रियाही विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा… शिंदे गटातील प्रवेशावर परिणाम ?

विधान परिषद निवडणुकीतील पराभव आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील संपुष्टात आलेले वर्चस्व भाजपच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका आक्रमकपणे लढण्याची त्यांची तयारी सुरु असल्याचे बावनकुळे यांच्या विधानावरुन दिसते. परंतु तेवढ्याच ताकदीने महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रपणे मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. एकीचे बळ काय असते आणि त्याचे परिणाम कसे येतात, हे विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतून आणि कसबा विधानसभा निवणुकीच्या निकालातून दिसले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकजुटीने लढण्याची मानसिकता तिन्ही पक्षांच्या नेत्यांची आहे. प्रश्न आहे तो जागा वाटपाचा. परंतु त्यातही अडचण येणार नाही, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… शिंदेबाबत आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपची सारवासारव

बावनकुळे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला किती टक्के मते मिळाली होती, जागा किती जिंकल्या होत्या, त्यात वाढ करण्यासाठी किती टक्के मतांची आवश्यकता आहे, याचे गणित मांडले आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजपला ४३ टक्के मते मिळाली होती आणि आणखी ८ टक्के मतांची गरज आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु मागील मतांची टक्केवारी पुढील निवडणुकीत जशीच्या तशी रहात नाही. तसे पहायला गेले तर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांची मागील निवडणुकीतील मते एकत्र केली तर ती ५३ टक्के होतात. त्यामुळे आकडयांचा खेळ बदलत असतो, जनमतही बदलत आहे, हेही अलिकडच्या कसबा पोट निवडणुकीने दाखवून दिले आहे, याकडे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा… छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरावरून राजकीय लाभाची गणिते

महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद मजबूत आहे. सुसंघटित असा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे एकटा शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आव्हान देऊ शकणार नाही याची जाणीव विरोधकांना आहे, त्यामुळेच एकजुटीशिवाय पर्याय नाही, हे वास्तव तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वीकारलेले आहे, त्यामुळेच एकत्रितपणे आगामी निवडणुकीत भाजपचा सामना करण्याचे त्यांनी ठरविले आहे. महाविकास आघाडीने लोकसभेच्या ४२आणि विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे, असे अतुल लोंढे यांनी सांगितले. त्यामुळे भाजपचे आघाडीपुढे नव्हे तर, आघाडीनेच भाजपपुढे आव्हान उभे केले आहे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition parties unity is the main challenges ahead of bjp print politics news asj
First published on: 18-03-2023 at 13:27 IST