राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य पदयात्रा सुरू केली आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील भितिहरवा येथील गांधी आश्रमातून या पदयात्रेस सुरूवात करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांन भाजपाची साथ सोडल्यानंतर, प्रशांत किशोर यांच्या या पदयात्रेमुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तर प्रशांत किशोर यांनी या पदयात्रेच्या सुरुवातीस सांगितले आहे की, ते आणि त्यांची टीम अशी राजकीय व्यवस्था तयार करण्याचा विचार करत आहेत, जी एखद्या व्यक्ती, कुटुंब किंवा विशिष्ट सामाजिक संयोजनाविषयी नाहीतर संपूर्ण समाजासाठी असेल.

याशिवाय प्रशांत किशोर यांनी आपल्या पदयात्रेविषयी ट्वीटद्वारेही माहिती दिली आहे. “सर्वात गरीब आणि मागास राज्य असणाऱ्या बिहारमधील व्यवस्थेत परिवर्तनाचा दृढ संकल्प, पहिलं महत्त्वपूर्ण पाऊल – समाजाच्या मदतीने एक नवीन आणि चांगली राजकीय व्यवस्था बनवण्यासाठी पुढील १२-१५ महिन्यांमध्ये बिहारमधील शहरं, गावं आणि वस्त्यांवर साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा होईल, चांगल्या आणि विकसित बिहारसाठी जनसुराज्य!” असं किशोर म्हणाले आहेत.

प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीमची ही पदयात्रा जवळपास साडेतीन हजार किलोमीटरची राहणार असून, याद्वारे ते ३८ जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत. ही पदयात्रा पूर्ण होण्यास जवळपास दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. पदयात्रा संपल्यानंतर प्रशांत किशोर आपल्या राजकीय पक्षाची सुरूवात करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

याचबरोबर “१९९०मध्ये बिहार गरीब राज्य होते, जे आजही गरीबच आहे. या दरम्यान कधी लालू प्रसाद यादव, नितीश कुमार तर कधी भाजपाला विजयी केलं. मी मत मागायला आलो नाही. मी तुमच्यामधील व्यक्तीला जिंकवू इच्छितो, जो तुमची चिंता करेल. इथे प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती घर सोडून गेलेला आहे. जर रोजगार मिळाला असता तर लोकाना घर सोडून जावं लागलं नसतं. तसेच, समाजाला निवडणूक लढवण्यासाठी योग्य व्यक्तींची ओळख व्हावी, असाही ही पदयात्रा सुरू करण्यामागचा उद्देश आहे. दर तीन दिवसांनी, मी लोकांना वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी एक दिवस राखून ठेवतो. तसेच पंचायत आणि विधानसभा मतदारसंघातील यात्रा संपताच, आमच्याकडे संभाव्य उमेदवारांबद्दल स्पष्टता असेल,” असंही किशोर म्हणाले.