संतोष प्रधान देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर 'जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री', असे विधान करत पंकजा मुंडे यांनी भाजप श्रेष्ठींना एकप्रकारे आव्हानच दिले होते. खाते बदलल्यावर, विधानसभा निवडणुकीतील पराभव किंवा विधान परिषदेवर संधी नाकारल्यावरही सतत राज्य नेतृत्वाला टोचून बोलण्याची संधी सोडली नव्हती. आता तर थेट पंतप्रधान मोदी यांच्याबाबत विधान. एवढे सारे होऊनही भाजपकडून पंकजा मुंडे यांना महत्त्व दिले जाते वा राष्ट्रीय सचिवपदी संधी देण्यात आली. पक्षाच्या मतपेढीत महत्त्वाचा वाटा असलेला वंजारी समाज पाठीशी असल्याने पंकजा यांना दुखावणे भाजपला शक्य झालेले नाही. पंकजा मुंडे या सातत्याने वादग्रस्त विधानांवरून प्रसिद्धीच्या झोतात राहतात. राज्यात भाजपला सत्ता मिळाल्यावर २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या त्या दावेदार होत्या. पण पक्षाने फडणवीस यांना संधी दिली. आपल्या वडिलांबरोबर काम करणाऱ्या फडणवीस यांना मुख्यमंत्री करणे त्यांना रुचले नव्हते. यातूनच मग त्यांनी ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच’, असे विधान केले होते. मंत्रिमंडळात काम करताना त्यांचे फडणवीस यांच्यााशी फार काही जमले नाही. अचानक पंकजा यांच्याकडील जलसंधारण हे खाते काढून घेऊन फडणवीस यांनी त्यांना सूचक इशाराच दिला. पंकजा यांच्या खात्यातील चिक्की घोटाळा बाहेर येण्यास पक्षाचे नेतेच जबाबदार असल्याचा जाहीरपणे आरोप पंकजाताईंच्या समर्थकांनी केला होता. त्यांचा सारा रोख तेव्हा फडणवीस यांच्यावर होता. बीडच्या राजकारणात पंकजा आणि धनंजय मुंडे या चुलत्यांमधील राजकीय वाद वाढत गेला तेव्हा भाजपच्या धुरिणांनी धनंजय यांना ताकद दिल्याचा पंकजा समर्थकांचा आक्षेप आहे. हेही वाचा. पिचड पितापुत्रांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न विधानसभा निवडणुकीत धनंजय यांच्याकडून झालेला पराभव पंकजा यांना फारच जिव्हारी लागला. पक्षाने त्यांची राष्ट्रीय सचिव व मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदी नेमणूक करून पुनर्वसन केले. पण राज्य भाजपमध्ये पंकजा यांचे खच्चीकरण झाले. ही बाब त्यांना सलत होती. राज्यसभेवर डॉ. भागवत कराड यांना घेऊन त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली. हे सारे मुंडे भगिनींच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच होते. बीडमधून विधान परिषदेवर आमदारकी देताना पंकजा यांना विश्वासात घेण्यात आले नाही. हेही वाचा. धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठविले जाणार ? विधानसभेतील पराभवानंतर विधान परिषदेवर संधी दिली जाईल, अशी त्यांना अटकळ होती. पण २०१९च्या पराभवानंतर तीन वर्षांत पक्षाने त्यांच्या नावाचा विधान परिषदेवर विचार केला नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये विचार होऊन शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल या आशेवर अजूनही त्या आहेत. पण पहिल्या विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. फडणवीस यांच्याकडे नेतृत्व असल्याने ते संधी देणार नाहीत, असे मुंडे समर्थकांचे म्हणणे आहे. हेही वाचा. महालक्ष्मी मंदिरात ऐन नवरात्र उत्सवात राजकीय कुरघोडी आता तर बोलण्याच्या ओघात त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी यांनाच आव्हान दिले. पक्षाकडून त्याची दखल घेतली जाईल हे नक्कीच. पण पक्षांतर्गत स्वत:चा दबदबा निर्माण करणाऱ्या किंवा राज्य नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या वादग्रस्त विधानांकडे पक्षाने आतापर्यंत दुर्लक्षच केले. गोपीनाथ मुंडे यांचा वंजारी समाजावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या पश्चात पंकजा यांचे समाजावर चांगले वर्चस्व आहे. हेही वाचा. Maharashtra Breaking News Live : केंद्र सरकारकडून ‘पीएफआय’वर बंदी; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर… पंकजा मुंडे यांना दुखावल्यास मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागातील मतदारसंघांमध्ये निर्णायक असलेल्या वंजारी समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. पक्षाचा पाया विस्तारण्याकरिता वसंतराव भागवत यांनी तेव्हा ‘माधव’चा (माळी, धनगर, वंजारी) प्रयोग केला होता. त्यातून बहुजन समाजात भाजपचा पाया विस्तारत गेला. मुंडे यांना ताकद देऊन पक्षाने वंजारी समाजाची एकगठ्ठा मते मिळतील अशी आखणी केली होती. पंकजा यांना दुखावल्यास ते पक्षाला परवडणारे नाही. यामुळेच पंकजा यांना फार काही महत्त्व द्यायचे नाही पण त्याच वेळी त्यांना दुखवायचे नाही, असे भाजपचे धोरण आहे.