-वसंत मुंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भावाबहिणीच्या राजकीय शत्रुत्वाची झलक बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाली. धनंजय मुंडे यांनी पंकजांवर थेट टीका न करता कारखान्याबाबत तक्रारी केल्या, तर पंकजा यांनीही त्यांचे नाव न घेता त्यांच्या तक्रारींना उत्तर दिले.

हेही वाचा : नव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि पंडितराव मुंडे या बंधूंनी शेतकरी हितासाठी वैद्यनाथ कारखाना चालवून आशिया खंडात नावलौकिक मिळवला होता. पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार हा कारखाना पाहण्यासाठी यायचे. मात्र सध्या या कारखान्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. यावर्षी कारखाना सुरू होईल की नाही याविषयीदेखील शेतकरी सभासदांना शंका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ कारखान्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली. कारखाना वेळेत सुरू करून क्षेत्रातील शंभर टक्के उसाचे गाळप करावे असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निमित्ताने मुंडे बंधु-भगिनीत राजकीय चकमक

बीड जिल्ह्यातील पांगरी (ता.परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. कारखान्याचे सभासद म्हणून सर्वसाधारण सभेत न जाता धनंजय मुंडे यांनी कारखान्याच्या कार्यालयाला भेट देऊन कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.दिक्षीतुलू, उपाध्यक्ष नामदेव आघाव यांना निवेदन दिले. दोन-तीन वर्षे या भागात चांगला पाऊस झाल्याने उसाचे जोरदार उत्पादन आहे. मात्र वैद्यनाथ कारखान्याची सर्व ऊस गाळप करण्याची परिस्थिती नव्हती. सन २०२१-२२ च्या हंगामात १५ फेब्रुवारी २०२२ नंतर ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यात ऊस घातला त्यांची हमीभावातील प्रति टन पाचशे रुपयांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. एप्रिल २०२२ पासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे मागील दहा ते बारा वेतन थकीत असून बहुतांश कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कारखान्याने भरलेली नाही. या संदर्भात काही कर्मचाऱ्यांनी आंदोलनेही केल्याची आठवण मुंडे यांनी कारखाना प्रशासनाला करून दिली.

कोणीही राजकीय शत्रू नाही-पंकजा मुंडे

वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्ष पंकजा मुंडे यांनी सर्वसाधारण सभेनंतर माध्यमांशी संवाद साधत वैद्यनाथ कारखाना २० नोव्हेंबरच्या आसपास सुरू होईल असे सांगितले. त्या म्हणाल्या, की परतीच्या पावसामुळे सुरुवातीला ऊस घेतल्यास रिकव्हरी होत नाही. गेल्या तीन वर्षांपासून कारखाना सुरू करण्याची परिस्थिती नाही, तरीही प्रत्येकवेळी मनाची हिंमत करून कारखाना चालू करत आहोत. यावर्षीही कारखाना सुरू करू. यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारशी बोलणे चालू आहे. आजारी कारखान्याच्या बाबतीत ते सकारात्मक भूमिका घेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : गाडगेबाबांच्‍या दशसूत्रीचे शिंदे-फडणवीस सरकारला वावडे

गेल्या वर्षीच कारखाना चालू करू शकत नव्हते. मात्र पैसे दिले नाही तरी चालेल, पण आमचा ऊस घेऊन जा असे शेतकऱ्यांनी त्या वेळी सांगितले होते. यावर्षी पुन्हा हिंमत करून कारखाना सुरू करत आहे. यंदा सरासरी चार लाख मे.टन पर्यंत उसाचे गाळप होईल असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केला. त्यांनी वैर म्हटले तरी मी कोणाशी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही, असेही पंकजांनी धनंजय मुंडेंचे नाव न घेता सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political controversy between pankaja munde and dhananjay munde on the occasion of vaidyanath sugar factory print politics news msr
First published on: 01-10-2022 at 10:53 IST