संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या राजकारणाची खडानखडा माहिती असलेल्या काही निवडक नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा समावेश होतो. आतापर्यंत ‘एकला चलो रे’ हे त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे ते संधी असूनही सत्तेच्या चौकटीत स्थिरावू शकले नाहीत. शिवसेनेबरोबर युती करून प्रकाश आंबेडकर यांनी ‘नवा घरोबा’ केला असला तरी युतीचे राजकारण त्यांना व शिवसेनेला कितपत मानवते यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून असतील.

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल नेहमीच संशयाने बघितले जाते. ‘भाजपचा ब संघ’ म्हणून त्यांना हिणवण्यात आले. अर्थात त्याचा त्यांनी प्रत्येक वेळी इन्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू किंवा दलित समाजातील त्यांची प्रतिमा लक्षात घेता आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’चा हट्ट सोडला असता तर ते राजकीय व्यवस्थेत ते अधिक पुढे आले असते किंवा केंद्र वा राज्याच्या सत्तेत त्यांना महत्त्वाची पदे मिळाली असती. पण त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. १९९८ मध्ये रा. सू. गवई, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे दलित चळवळीतील पहिल्या फळीतीली नेते काँग्रेसबरोबर आघाडीत लोकसभेवर निवडून आले होते. पण हे ऐक्य पुढे टिकले नाही.

हेही वाचा… शिवसेना-वंचित युतीनंतर महाविकास आघाडीतच कटकटी वाढल्या

रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपशी हातमिळवणी करीत सत्तेची फळे चाखली. प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थाापित पक्षांशी युती करणे टाळले होते. २००४ किंवा २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लोकसभेत पाठिंबा किंवा राज्यसभेची खासदारकी देण्याची तयारी दर्शवूनही आंबेडकर यूपीएबरोबर गेले नाहीत. त्यांच्या काहीशा हट्टी स्वभावामुळेच वंचित बहुजन आघाडीला मर्यादित यश मिळत गेले. आंबेडकर यांचा ‘अकोला प्रयोग’ यशस्वी झाला. पण त्याच्या शेजारी – पाजारील जिल्ह्यांमध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. मुंबई, पुण्यातही रामदास आठवले यांच्या रिपाईच्या तुलनेत आंबेडकर यांच्या पक्षाला तेवढा जनाधार मिळाला नाही. २०१९च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला धक्का दिला होता.

हेही वाचा… अमरावती पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार ?

प्रकाश आंबेडकर यांनी आता शिवसेनेशी युती केली आहे. पण त्यांचा काँग्रेस व राष्ट्रवादी विरोध अद्यापही कमी झालेला नाही. युतीची घोषणा होताच त्यांनी लसगेचच शरद पवार यांच्यावर हल्ला चढविला. तसेच शरद पवार यांनी आमच्याबरोबर यावे, असे आवाहन केले. काँग्रेसवर टीकाटिप्पणी करण्याची ते संधी सोडत नाहीत. यामुळे ‘ नवीन घरोबा’ आंबेडकर यांना कसा मानवणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो. वंचितबरोबर युती केल्याने शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग नव्याने होणार आहे. याचा कोणाला फायदा होईल हे निवडणूक निकालांमधूनच स्पष्ट होईल. शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस – वंचित बहुजन आघाडी हे एकत्र आल्यास आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे आव्हान असेल. यामुळेच भाजपने सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसने वेगळी चूल मांडली तरीही शिवसेना-राष्ट्रवादी व वंचितची युती राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.
प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी नवीन पाऊल टाकले आहे. त्याचा वंचितला कितपत फायदा होतो हे महत्त्वाचे असेल. रामदास आठवले यांचे नेतृत्व पूर्वीएवढे प्रभावी राहिलेले नाही. भाजप त्यांच्या निळ्या झेंड्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल. कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. शिवसेनेबरोबर युतीत प्रकाश आंबेडकर किती प्रभावी ठरतात याकडे राजकीय वर्तुळात लक्ष असेल. या युतीचा शिवसेना की आंबेडकर यांना अधिक फायदा होतो, आंबेडकर महाविकास आघाडीत सहभागी होतात का, हे व असे अनेक प्रश्न या युतीतून निर्माण झाले आहेत.

हेही वाचा… Vanchit Bahujan Aaghadi: “माझी युती शिवसेनेबरोबर, मला इतरांचं…” प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले!

युतीची घोषणा हाताच लगेचच आंबेडकर यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यातूनच आंबेडकर नव्या व्यवस्थेत कशी भूमिका वठवितात याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतील.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar new political step will be successfully print politics news asj
First published on: 28-01-2023 at 11:48 IST